मुंबई, 11 मार्च : नैसर्गिक वनौषधीचा वापर करून अनेक आयुर्वेदिक औषधे आणि सौंदर्य प्रसाधने निर्माण केली जातात. भारतात पारंपरिक पद्धतीनं तयार करण्यात येणाऱ्या आयुर्वेदिक औषधांची बाजारपेठ मोठी आहे. त्यात कच्चा माल किंवा मुख्य घटक असलेल्या अनेक नैसर्गिक वनौषधींची मागणी मोठी असते. त्यामुळे औषधी वनस्पतींची लागवड हा अनेक शेतकऱ्यांचा मोठा व्यवसाय आहे. या शेतीने अनेक शेतकऱ्यांना हात दिला आहे. आजकाल अनेक कंपन्या करारावर अशी औषधी वनस्पतीची शेती करण्याची संधी देत आहेत.
या शेतीसाठी जमीन कमी लागते, तसंच खर्चही कमी असतो. त्याचप्रमाणे या वनस्पती तयार होण्यासाठी लागणारा वेळही इतर पिकांच्या मानाने कमी असतो. यातून कमाई मात्र दीर्घकाळ करता येते. अशी शेती करण्यासाठी फक्त काही हजार रुपये खर्च करण्याची आवश्यकता असते, परंतु यातून लाखांमध्ये कमाई करता येते.
टोमॅटोला फक्त 2 रुपये किलो भाव, निराश शेतकऱ्यानं पिकांमध्ये सोडली जनावरं!
कोरोना काळात देशभरात लोकांचा आयुर्वेदिक आणि नॅच्युरल औषधांकडे कल वाढला आहे. त्यामुळे याची मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. सध्या तुळशीचा बाजारही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशात औषधीय झाडांचा, औषधीय रोपटी लावण्याचा व्यवसाय सुरू केल्यास, फायदेशीर ठरू शकतो.
तुळशी, आर्टेमिसिया अॅनुआ, ज्येष्ठमध, कोरफड इत्यादी औषधी वनस्पतींची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे भारतात अशा अनेक औषधी वनस्पती आहेत, ज्यांचा वापर विविध आजारांवरील गुणकारी औषधांमध्ये केला जातो.
तुळशीचं (Basil) महत्त्व तर आपल्या देशात प्राचीन काळापासून ज्ञात आहे. घराघरात तुळस लावली जाते. तिची पूजा केली जाते. घरगुती औषधांमध्ये तुळशीचा वापर प्रामुख्यानं केला जातो. खोकला, सर्दी, श्वसनाचे आजार यावरच नव्हे तर कर्करोगावरही (Cancer) तुळस गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे.
युजेनॉल आणि मिथाइल सिनामेट असलेल्या तुळशीचा वापर कर्करोगासारख्या गंभीर आजारांवरील औषधे बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे व्यावसायिक पातळीवर तुळशीची मागणी वाढली आहे. तुळशीच्या बिया आणि तेलाची बाजारपेठही मोठी आहे. तुळशीचे बियाणे आणि तेल यांच्या दरात रोज चढ-उतार होत असते. दररोज नवीन दराने ही उत्पादने विकली जातात.
पावसाळी हवामानात कशी घेणार पिकांची काळजी? कृषी विभागानं दिल्या महत्त्वाच्या टिप्स
पतंजली, डाबर, वैद्यनाथ इत्यादी आयुर्वेदिक औषधे बनवणाऱ्या कंपन्या तुळशीची कंत्राटी शेती करून घेत आहेत. या कंपन्या शेतकऱ्यांना तुळशीची शेती करण्यासाठी बियाणे, अन्य आवश्यक मदतीसह पीक खरेदीची हमीही देतात. एका हेक्टरवर तुळस पिकवण्यासाठी फक्त 15 हजार रुपये खर्च येतो, परंतु 3 महिन्यांनंतर हे पीक सुमारे 3 लाख रुपयांना विकले जाते. याची मागणी तर सातत्याने होतच असते त्यामुळे कमाईही कायम होत राहणार याची हमी असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Farmer, Organic farming