ठाणे, 05 एप्रिल : ‘याच्यावर एफआयआर टाका, त्याच्यावर गुन्हे दाखल करा. आज सांगतोय, हे सरकार काही तासांचं आहे. पोलीस अधिकाऱ्यांना सांगतोय, सरकार आल्यानंतर चौकशी करणार म्हणजे करणार आहे, मग जेलभरो आंदोलन करणार आहे. जेलभरो आंदोलनमध्ये तुम्हाला आणि गद्दारांना जेलमध्ये भरल्या शिवाय राहणार नाही, असा इशाराच आदित्य ठाकरेंनी दिला आहे. रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी महाविकास आघाडीने ठाण्यात महामोर्चा काढला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी कडक भाषण केलं. ‘कुणाबद्दल काही बोलू नये, कुणावर टीका करू नये. महिलांवर हात उचलला जात आहे. सुषमा अंधारे, सुप्रिया सुळेंना शिवीगाळ केली जात आहे. पण तरीही मर्दांगी दाखवायची आहे. इकडे शर्ट खाली खेचत, वरती खाली बघत, दाढी खाजवत असं काही करत, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची नक्कल केली. यावेळी उपस्थितीत शिवसैनिकांनी वन्स मोर अशी मागणी केली. पण, वन्स मोर नाही, अशा लोकांना आता परत येऊ द्यायचं नाही, अशी लोक इथं येऊन ओली होतात. आता मलाही दाढी आहे, नाहीतर आम्हाला सलुन टाकावं लागेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
राज्य कसं चाललं आहे, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांवर बोलणार आहे. ठाणे संस्कृत शहर म्हणून ओळखलं जात होतं. ठाण्यात काल भयानक घटना घडली. महिलेला मारहाण झाली आहे. ती गरोदर आहे, तिच्यावर आयव्हीएप उपचार सुरू आहे. तिने दयायाचना केली केली. पण तरीही तिच्यावर हात उचलला. एका महिलेवर हात उचलला त्याबद्दल मुख्यमंत्री म्हणून एक शब्द बोलला नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. (…नाहीतर योग्य जागी पाठवलं जाईल, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा) ‘गद्दार गँगने सवयीप्रमाणे पलटी मारली. भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या घरी ईडी, सीबीआय येणार नाही. यांचे गुन्हे 100 आहे, त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या 100 लोकांनी याला धू धू धुतलं. दुसऱ्या दिवशी सभागृहात आवाज कुणी उचलला, अनिल परब, जितेंद्र आव्हाड यांनी उचलला. भाजपमध्ये जाऊन देखील मारहाण होते, त्या 55 जणांवर गुन्हा दाखल होत नाही. महाशक्तीने माफ केलं की काय? असा सवालही आदित्य ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरे यांच्यावर फेसबुक लाईव्हवर बोलत असल्याचा आरोप केला. पण त्या फेसबुक लाईव्ह मुळे सुरतसारखी अवस्था नाही झाली, गंगेच्या किनाऱ्यासारखी अवस्था नाही झाली, तरीही शिंदेंनी फेसबुक लाईव्ह करून टाकलं. एवढंच नाहीतर त्यांनी एकाच दिवसात पंतप्रधान मोदी यांना बदलून टाकलं आणि मुर्मू यांचं पंतप्रधान म्हणून उल्लेख केला, अशी खिल्लीही आदित्य ठाकरेंनी उडवली.