वाशिम, 23 जानेवारी : आदर्श सरपंच अशी ओळख असणारे आणि गावखेड्यातील लोकांचं राजकीय प्रबोधन करणारे भास्कर पेरे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. आपल्या रोखठोक राजकीय भूमिकांसाठी ते ग्रामीण महाराष्ट्रात लोकप्रिय झाले आहेत. याच भास्कर पेरे पाटील यांनी राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या वयोमर्यादेबाबत भाष्य केलं आहे.
'वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर राजकारण्यांनी निवृत्ती घेत नवीन लोकांना संधी देऊन गावाची सूत्र आपल्या पुढील पिढीकडे दिली पाहिजेत,' असं मत पाटोद्याचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. ते वाशिम इथं आयोजित समृद्ध गाव समृद्ध चर्चा या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी आले असता बोलत होते.
लोकशाहीमध्ये निवडणूक महत्त्वाची आहे. भयमुक्त बिनविरोध निवडणूक झाल्यास ते योग्य आहे. मात्र दबाव टाकून किंवा अपहरण करून बिनविरोध निवडणूक होत असेल तर ते लोकशाहीसाठी घातक आहे, असंही भास्कर पेरे पाटील म्हणाले.
हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणुकीतील मोठी बातमी, भास्कर पेरे पाटील यांना गावातच धक्का
'ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी घसरली आहे. कारण जनतेचा राजकारण्यांवरील विश्वास उडाला आहे. चांगली माणसं निवडून येत नाही, अशी लोकांची धारणा झाली आहे म्हणून लोक मतदान करणं टाळतात. यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली आहे. मात्र लोकशाही टिकवायची असेल तर प्रत्येकाने मतदान करायला पाहिजे,' असं आवाहन पेरे पाटील यांनी वाशिममध्ये बोलताना केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gram panchayat, WASHIM NEWS