बारामती, 10 ऑगस्ट : महाराष्ट्रातल्या राजकीय भुकंपाला (Maharashtra Politics) दोन महिने होत नाहीत तोच बिहारमध्येही सत्ताबदल झाला आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पुन्हा एकदा भाजपची (BJP) साथ सोडली आणि लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीसोबत युती केली. कालच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची आणि तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्र आणि बिहारमध्ये झालेल्या या सत्तांतरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भूमिका मांडली. भाजप निवडणुकीसाठी मित्रपक्षांसोबत युती करते, पण निवडणुकीत मित्रपक्षांच्या जागा कशा कमी येतील याची काळजी ते घेतात. पंजाबमध्ये अकाली दलसारखा (Akali Dal) पक्ष जवळपास संपुष्टात आला आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप एकत्र होते. शिवसेनेत (Shivsena) दुरी कशी येईल, अशी परिस्थिती निर्माण केली आणि सेनेवर आघात केला, असं शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रानंतर शरद पवारांनी बिहारचं उदाहरण दिलं. मित्रपक्षांच्या जागा कमी कशा येतील, याची काळजी भाजप घेतं. महाराष्ट्रातही तेच झालं, बिहारमध्येही तेच झालं, पण नितीश कुमार वेळीच सावध झाले, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं.
शरद पवार जे बोलतात त्याचे बरेच राजकीय अर्थ नेहमीच काढले जातात. नितीश कुमार वेळीच सावध झाले असं म्हणताना शरद पवारांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बेसावध राहिले, असं तर म्हणायचं नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.