मुंबई, 13 सप्टेंबर : वेदांता-फॉक्सकॉन ही कंपनी महाराष्ट्रात गुंतवणूक करणार होती, पण आता ही कंपनी गुजरातमध्ये त्यांचा प्रकल्प उभारणार आहे, यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. आदित्य ठाकरे यांच्या या आरोपांवर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आघाडी सरकारच्या काळात फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पाला गुजरातपेक्षा चांगलं पॅकेज तुम्ही का दिलं नाही? याचं उत्तर द्या आणि मग पुढचे प्रश्न विचारा. तुम्ही हा प्रकल्प महाराष्ट्रात का आणू शकला नाहीत, सत्य लपवण्यासाठी गळे काढू नका. पेग्विन सेना ही प्रकल्प विरोधी सेना आहे,’ असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं. ‘तुमचा बुलेट ट्रेनला विरोध आहे ना? 44 अब्ज डॉलरची गुंतवणूक आणणाऱ्या नाणार प्रकल्पाला विरोध करताय ना? 1 लाख कोटींची गुंतवणूक आणणाऱ्या जैतापूर प्रकल्पालाही पेग्विन सेनेचा विरोधच ना? हा प्रकल्प महाराष्ट्राला मिळाला नाही, याचं दु:ख आम्हालाही आहे, पण तुमचे अश्रू मगरीचे!’ असा निशाणा आशिष शेलार यांनी साधला आहे.
◆तुमचा बुलेट ट्रेनला विरोध आहे ना?
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 13, 2022
◆ 44 अब्ज डॉलरची गुंतवणूक आणणाऱ्या नाणार प्रकल्पाला विरोध करताय ना?
◆ 1 लाख कोटींची गुंतवणूक आणणाऱ्या जैतापूर प्रकल्पालाही पेग्विन सेनेचा विरोधच ना?
हा प्रकल्प महाराष्ट्राला मिळाला नाही, याचे दु:ख आम्हालाही, पण तुमचे अश्रु मगरीचे! (2/2)
काय म्हणाले आदित्य ठाकरे? “वेदांता प्रकल्प राज्यात येणार होता. पण तो प्रकल्प गुजरातला गेला. या प्रकल्पामुळे राज्यातील 1 लाख तरुणांना रोजगार मिळू शकला असता. राज्यातील ही गुंतवणूक नेमकी का निघून गेली ते स्पष्ट करा. वेदांता कंपनीच्या अनिल अग्रवालांशी चर्चा केली होती. फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्राबाहेर गेली. महाराष्ट्रात येणारी कंपनी शेवटच्या मिनिटाला गुजरातला निघून गेली. ती का निघून गेली?”, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. “राज्यातलं सरकार हे खोके सरकार आहे. जीत के हारने वालो को खोके सरकार कहते है”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.