वाई, 16 ऑक्टोबर : राज्यातील गडकिल्ल्यांवर डान्सबार करण्याला परवानगी द्यायला हवी असं कोणतंही वक्तव्य मी केलेले नसल्याचं भाजपचे साताऱ्यातील लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केलं. असं वक्तव्य करण्यापेक्षा मेलेलं बरं, यापुढे मी पत्रकार परिषदही घेणार नाही, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. गडकिल्यांवर लग्न सोहळ्यासाठी जागा दिली पाहिजेत त्यामुळे अर्थव्यवस्था सुधारेल, असं वक्तव्य उदयनराजे यांनी केल्याचा दावा एका दैनिकामध्ये करण्यात आला होता. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर उदयनराजे भोसले यांच्यावर राज्यभरातील शिवभक्तांकडू मोठी टीकेची झोड उठली. अखेर, आपल्या या विधानावर उदयनराजे यांनी आपल्या शैलीत स्पष्टीकरण दिलं. वाईमध्ये मदन भोसले यांच्या प्रचारार्थ ते आले होते. त्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन या बाबतचा खुलासा केला. गडकिल्ल्यांसंदर्भात असा निर्णय होणार असेल तर तो वेडेपणाच आहे. मी जे बोललो नाही त्याचे खापर माझ्यावर का फोडतात? असा सवालच उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला. मला काय वेड लागले आहे का? गड किल्यावर डान्सबार सुरू करा अस सांगायला. मी हा विचार करण्यापेक्षा मी मेलेले परवडले. माझ्या माहितीचा विपर्यास केला आणि यातून माजे चारित्र्यहन केले असा, आरोपही त्यांनी केला. काय आहे गडकिल्ल्याचा निर्णय? राज्यातील जवळपास 25 गडकिल्ले लग्नसोहळ्यासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला होता. पर्यटन वाढीसाठी राज्य मंत्रिमंडळाने 3 सप्टेंबरला या धोरणाला संमती दिली होती. राज्य सरकारच्या मालकीचे किल्ले एमटीडीसी भाडे करारावर देण्याचे ठरले होते. फक्त हॉटेलसाठीच नव्हे तर विवाह समारंभ आणि मनोरंजनासाठीही किल्ल्यांवर विकास केला जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं म्हटलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळताच पर्यटन विभाग पुढचं पाऊल उचलणार असल्याची माहितीही समोर आली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. शिवरायांच्या इतिहासाशी खेळ करण्याचा आणि शिवरायांचा प्रभाव कमी करण्याचा भाजपाचा प्रयत्न कायम आहे. आधी शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी केली आणि आता शिवरायांचे गडकिल्ले हॉटेल्स आणि लग्नस्थळ म्हणून उद्योगपतींना आंदण देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे 60 ते 90 वर्षांच्या भाडेकरराने हे गडकिल्ले खासगी उद्योगांना दिले जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून हि उद्योगपतींना दिलेले भेटच आहे. गडकिल्ले हे शिवरायांच्या कर्तृत्वाचे प्रतीक आहेत, भाजपा सरकारने महाराष्ट्राच्या अस्मितेशी सुरू केलेला खेळ थांबवावा असंही त्यांनी म्हटलं आहे. विरोधकांच्या आणि माध्यमांच्या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय मागे घेतला असल्याची घोषणा केली होती. ============================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.