रांजणगाव, 11 मार्च : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव इथं दोन मित्रांनीच मित्राची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दादासाहेब भाऊसाहेब नवले असं हत्या झालेल्या 51 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 मार्च रोजी संध्याकाळी 6.45 वाजेच्या सुमारास दादासाहेब नवले यांचं आरोपी विनोद जाधव (वय 19) आणि सुनिल जाधव (वय 19 ) या दोन्ही तरुणांनी अल्टो कारमधून दोघांचं अपहरण केलं होतं. अपहरण करून नेल्यानंतर कारमध्ये दोघांनी नवले यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर कंबरेच्या बेल्टने गळा आवळून नवले यांचा खून केला. खून केल्यानंतर शिरूर जवळील घोड नदीपात्रात त्यांचा मृतदेह फेकून दिला होता.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत दोन्ही आरोपींना अटक केली. तपासात, दोघांनीही नवले यांचा खून केल्याचं कबूल केलं आहे. तपासात दिलेल्या कबुली जबाबात हे तिघेही जण दारू पिऊन रात्री उशिरा एकत्र घरी जात होते. दारूच्या नशेत कारमध्ये तिघांचा वाद झाला. वाद झाल्यानंतर तिघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर रागाच्या भरात आरोपी विनोद जाधव आणि सुनिल जाधव याने कंबरेच्या बेल्टने नवले यांचा गळा आवळला.
पोलिसांनी याच परिसरात ग्रामपंचायतीने लावलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला. यात तिघेही जण एका कारने जात असल्याचं आढळून आलं. त्यानंतर गोपनिय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सुरुवातील दोघांनी गुन्हाची कबुली देण्यावरून उडवाउडवीची उत्तरं दिली. नंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच गुन्हाची कबुली दिली. खून केल्यानंतर नवले यांचा मृतदेह हा शिरूर जवळील घोड नदीपात्रात फेकून दिल्याचं सांगितलं. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन नवले यांचा मृतदेह ताब्यात घेतला.
परंतु, दोघांनी नवले यांचा खून का आणि कशासाठी केला, याची नेमकी माहिती अद्याप मिळू शकली नाही. या प्रकरणी रांजणगाव पोलीस अधिक तपास करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.