सोलापूर, 13 सप्टेंबर : सोलापूर (Solapur Suicide Case) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आमचे प्रेम समाजाला मान्य नाही, अशी चिठ्ठी लिहत प्रेमीयुगुलांनी आपले जीवन संपवले. ही घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ या गावात घडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यांनी हे टोकाचे का पाऊल उचलले याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
मागील वर्षीच गणेश विद्यालयात इयत्ता बारावी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेली प्रांजली भारत सुतार व विवाहित असलेले वाजीद चांद इनामदार अशी प्रेमीयुगुलांची नावे आहेत. या घटनेची माहिती मंगळवारी सकाळी 7 वाजता सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.
हे ही वाचा : मोटरमनच्या सतर्कतेमुळे 10 वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा डाव फसला; पुणे स्टेशनवरील घटनेचा CCTV Video
दरम्यान, या दोघांनी स्वतंत्र दोन चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. त्या चिठ्ठ्या पोलिसांच्या हाती लागल्या असून आमचं प्रेम समाजाला मान्य नाही… म्हणून हे कृत्य आम्ही करत आहोत, याबाबत कोणासही जबाबदार धरू नये, असा मजकूर चिठ्ठीत लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
पुण्यातही भयानक प्रकार
ऐनवेळी प्रियकर किंवा प्रेयसीकडून लग्नास नकार मिळाल्यावर अनेकजण नैराश्यात जातात. मात्र, काही लोक असेही असतात ज्यांना हे सगळं सहन होत नाही आणि ते टोकाचं पाऊल उचलतात. लग्नास नकार मिळाल्याने आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना लोणावळ्यातून समोर आली आहे.
लोणावळ्यातील रामनगर येथे प्रेमविवाह करण्याचं स्वप्न पाहिलेल्या तरुणीने आत्महत्या केली आहे. परभणी येथील तरुणाने लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीने आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्येपूर्वी तरुणीने लिहिलेल्या चिठ्ठीवरुन लग्नास नकार मिळाल्याने तिने हे पाऊल उचलल्याचं स्पष्ट झालं आहे, अशी माहिती लोणावळा पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हे ही वाचा : नागपूर : लग्नाला विरोध म्हणून उचललं टोकाचं पाऊल, प्रेयसीचा मृत्यू तर प्रियकर..
या घटनेमुळं लोणावळ्यातील रामनगर येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातील रामनगर येथील या तरुणीचे परभणीमधील एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. दोघं लग्नही करणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांच्यामध्ये काही कारणावरुन वाद झाला. यानंतर तरुणाने लग्न करण्यास नकार दिला.