असिफ मुरसल, प्रतिनिधी सांगली, 12 एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उपयोग फक्त राजकारणासाठी उपयोग केला जात आहे, असा गंभीर आरोप ऑल इंडिया बुद्धिस्ट सोसायटीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी केला आहे. तसेच केवळ बाबासाहेबांचे पुतळे उभे करून काही होणार नाही, संविधान वाचवण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. ते सांगलीच्या जत येथे बोलत होते.
सांगलीच्या जत शहरात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा राज्याचे कामगार मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी खासदार संजयकाका पाटील, जतचे आमदार विक्रम सावंत, बुद्धिस्ट सोसायटीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर आणि जतचे आरपीआय नेते संजय कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 12 फुट पुतळ्याचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. राजरत्न आंबेडकर काय म्हणाले? यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना राजरत्न आंबेडकर म्हणाले की, आज अनेक वर्षांपासून इंदू मिलच्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम रखडले आहे. त्यामुळे आता आमची मागणी आहे, सरकारने इंदू मिलच्या ठिकाणी स्मारक करू नये. एक रुपयादेखील त्यासाठी खर्च करू नये. फक्त ती जागा समाजाच्या नावावर करावी. आम्ही सहा महिन्यात हैदराबादपेक्षा मोठे स्मारक उभे करू. असा दावा त्यांनी केला. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नावाचा वापर केवळ राजकारणासाठी केला जात आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. तसेच देशातील भारत सरकार अस्तित्वात नसून मोदी सरकार अस्तित्वात आले आहे. पुन्हा शूद्र बनवण्याची वाटचाल देशात सुरू आहे. त्यामुळे आज देशाचे संविधानच, देशाला तारू शकते. अन्य कोणताही ग्रंथ या देशाला तारू शकत नाही. त्यामुळे संविधान वाचवण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. ज्या बाबासाहेबांनी जाती अंताची लढाई केली, त्या बाबासाहेबांना एका जाती पुरता मर्यादित करण्यात आले, असे मतदेखील राजरत्न आंबेडकर यांनी यावेळी व्यक केले आहे.