मुंबई, 29 मार्च : महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिलासा दिला आहे. तसंच आभारही व्यक्त केले आहेत. 'आपणा सर्वांना धन्यवाद देतो. आपण सर्व सूचनांचं पालन करत आहात. तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात. विरोधी पक्षही माझ्या सोबत आहे. राजही मला फोन करून दिलासा आणि सूचना देत आहे,' अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
'आपली टीम आता चांगली तयार झाली आहे. सर्व देशातील आणि राज्यातील कामगार त्यांच्या देशात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी जिथे आहात तिथेच थांबा. या सर्वांना जेवणाची आणि राहाण्याची आपण व्यवस्था करतोय. यासाठी राज्यात 163 ठिकाणी केंद्र सुरू करत आहोत,' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
'जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास उघडी ठेवण्याची निर्णय घेतला आहे. तरी देखील काही लोक बाहेर पडत आहेत. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे विनाकारण बाहेर येऊ नका घरातच राहा. पंतप्रधान मोदी माझ्याशी बोलत आहेत. अमित शहा आणि जावडेकरदेखील माझ्याशी बोलत आहेत,' असा खुलासा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे नक्की काय म्हणाले?
शिवभोजन जे 10 रुपयांना मिळत होते. ते आता फक्तं 5 रुपयांत मिळेल.
ही आणीबाणीची स्थिती आहे. वर्दळ ताबडतोब थांबवा.
सर्व डाँक्टर आणि त्यांच्या टीमला मानाचा मुजरा करतो.
डॉक्टरांशी बोलल्यावर माझं धेर्य वाढतंय.
टप्पा टप्याने पुढे चाललोय.
हा जीवघेणा खेळ आहे.
बरेच पॉझिटिव्ह पेशंट बरे होत आहेत.
आता न्युमोनिया चे पेशंट वाढण्याची शक्यता आहे.
या रोगालाल पहिल्या पायरीवरच रोखत आहोत.
काही लोकं कॉरन्टाईन आहेत त्यांची इतरांनी काळजी घ्या आणि लक्ष ठेवा.
गरोदर महिला आणि वरिष्ठ नागरिकांना विविध आजार असतील तर त्यांना जपलं पाहीजे.
गुणाकाराचा काळ जो आहे तो हाच आहे... आणि याच काळात आपल्याला या रोगाची वजाबाकी करायची आहे.
आपल्याकडे औषधांचा तुटवडा नाही. मोठी दुर्घटना घडेल असं काही करू नका.
ही जिद्द आणि हा संयम कायम ठेवा.
सरकारला कठोर पावलं उचलायला लावू नका.
अशी स्थिती जगाने कधीच अनुभवली नाही.
घरातच राहा आपल्याला ही लढाई जिंकायची आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.