जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'शिवरायांचा अपमान करणारेच ‘औरंगजेबजी’ चा सन्मान करू शकतात, राऊतांचा बावनकुळेंवर निशाणा

'शिवरायांचा अपमान करणारेच ‘औरंगजेबजी’ चा सन्मान करू शकतात, राऊतांचा बावनकुळेंवर निशाणा

'शिवरायांचा अपमान करणारेच ‘औरंगजेबजी’ चा सन्मान करू शकतात, राऊतांचा बावनकुळेंवर निशाणा

तेव्हा औरंगजेब हा क्रूर शासक नव्हता असे कसे म्हणायचे? पुन्हा बावनकुळय़ांचे ‘सन्माननीय औरंगजेबजी’ प्रकरण पंतप्रधान मोदींजी यांनाही न पटणारे आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान सहन करणारेच ‘औरंगजेबजी’ यांचा सन्मान करू शकतात

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 08 जानेवारी : ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर गप्प बसणारे छत्रपती संभाजीराजांच्या कथित अपमानावर अजित पवारांच्या विरोधात रान उठवत आहेत. औरंगजेब क्रूर नव्हता, असा साक्षात्कार राष्ट्रवादीच्या एका आमदारास याच वेळी झाला आणि औरंगजेबजी हे सन्माननीय आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पटले. महाराष्ट्रातील धार्मिक गोंधळाचा हा नवा इतिहास’ असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब वादाच्या प्रकरणाच्या वादावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरातून पुन्हा एकदा भाजपवर टीकेची छोड उठवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचे प्रकरण आता मागे पडले असून भारतीय जनता पक्षाने वडिलांच्या अपमानावर उतारा म्हणून पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या अपमानाचे प्रकरण समोर आणले. शिवरायांचा अपमान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राजभवनात बसून आहेत व संभाजीराजांच्या अपमानाबद्दल अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने सुरू केली. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाची ही दशा आहे. शिवाजी महाराजांच्या अपमानाचे प्रकरण सगळ्यात जास्त गंभीर असतानाही भाजपने त्यावर आवाज उठवला नाही याची इतिहासात नोंद राहील. दि. 4 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मुंबईत आगमन झाले. राजभवनावर योगींना भेटण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस गेले. त्या भेटीदरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सुहास्यवदनाने उभे असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांशी महाराष्ट्रातील ‘पोलिटिकल कपल’ अत्यंत सलगीने वागताना टीव्हीच्या वृत्तवाहिन्यांवर जनतेने पाहिले. प्रेम आंधळे असते, पण यांना सत्तेने आंधळे केले व त्या अंधारात शिवरायांचा मान-सन्मान हरवला, अशी टीका राऊत यांनी केली. (‘अशा महिला बिनडोक..’ उर्फी जावेद वादात करुणा मुंडेंची उडी; थेट राजकीय महिलांवर साधला निशाणा) राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केला. संभाजीराजांचा अपमान अजित पवारांनी केला असा भाजपचा दावा. ‘संभाजीराजे हे स्वराज्य रक्षकच, धर्मवीर नाहीत’ या पवारांच्या विधानावर आता भाजपने वाद केला; पण संभाजीराजे धर्मवीर म्हणून मान्य पावले ते औरंगजेबाने त्यांच्यावर केलेल्या निर्घृण अत्याचारामुळे. त्या औरंगजेबाचा अत्यंत आदरपूर्वक ‘‘मा. औरंगजेबजी’’ असा उल्लेख काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. याच ‘औरंगजेबजी’ यांनी धर्मवीर संभाजीराजांना अटक केली, त्यांची धिंड काढली, त्यांना विदूषकी पोशाख घातला, त्यांची निर्घृण हत्या केली. त्यांचे डोळेही फोडले, पण संभाजीराजेंनी धर्माभिमान व स्वाभिमान सोडला नाही. हे सर्व ज्या क्रूरकर्मा औरंगजेबामुळे घडले ते ‘औरंगजेबजी’ काय साधी असामी होती? असेच भाजपच्या बावनकुळेंना म्हणायचे आहे’ असा थेट सवाल राऊत यांनी बावनकुळेंना विचारला. ‘राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी इतिहासाला नवे वळण देण्याचे काम याच दरम्यान केले. ‘‘औरंगजेब क्रूर नव्हता,’’ अशी नवीच माहिती आव्हाडांनी समोर आणली. औरंगजेबाचे माहात्म्य सांगताना आव्हाड यांनी सांगितले, ‘‘विष्णूच्या मंदिरासमोर संभाजीराजांना अटक केली, पण औरंगजेबाने विष्णूचे मंदिर तोडले नाही.’’ या एका पुराव्याने औरंगजेबास क्रूर नसल्याचे व थोर मानवतावादी असल्याचे प्रमाणपत्र आव्हाड यांनी दिले व बहुधा त्याचमुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आव्हाड यांना धारेवर धरताना औरंगजेबाचा उल्लेख ‘औरंगजेबजी’ असा केला. पण मला तेच एकमेव कारण दिसत नाही. औरंगजेबास ‘माननीय’ किंवा ‘औरंगजेबजी’ ठरवण्यामागे भाजप नेत्यांची मानसिकता अशी की, औरंगजेबजी यांचा जन्म गुजरातमधील दाहोद येथे झाला. जन्माच्या वेळी औरंगजेबाचे ‘पिताश्री’ गुजरातचे सुभेदार होते. औरंगजेबाच्या या गुजरात कनेक्शनमुळेच बावनकुळे यांनी त्याचा उल्लेख ‘औरंगजेबजी’ असा केला असावा, असा टोलाही राऊत यांनी बावनकुळेंना लगावला. मागे एकदा काँग्रेसच्या नेत्याने अफझल गुरूचा उल्लेख ‘अफझल गुरूजी’ असा करताच याच भाजपने राष्ट्रवादाच्या नावाखाली धुमाकूळ घातला होता, अशी आठवणही राऊतांनी करून दिली. (अशा 56 नोटीशी.. चित्रा वाघ यांचा पुन्हा एकदा चाकणकरांवर निशाणा; म्हणाल्या उर्फी..) औरंगजेब एक क्रूर शासक होता, अशी महाराष्ट्राची धारणा आहे. सिंहासनावर बसण्यासाठी त्याने आपला भाऊ व बापाची हत्या केली. महाराष्ट्रात त्याने अनेक मंदिरांची धुळधाण केली. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना विश्वासघाताने कैद केले. लाखो हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतरण व कत्तल केली. असा क्रूर शासक ‘क्रूर’ नव्हता, या आव्हाड यांच्या विधानावर भाजपचे एक आमदार राम कदम यांनी औरंगजेबाच्या क्रूरतेची ही माहिती सादर केली. त्याच औरंगजेबाचा ‘सन्माननीय औरंगजेबजी’ असा उल्लेख भाजपच्या अध्यक्षांनी केला. ‘औरंगजेब व त्यांच्या आक्रमक फौजेपुढे न झुकण्याची प्रेरणा गुरू गोविंदसिंह व त्यांच्या वीर पुत्रांनी दिली. गुरू गोविंदसिंहांचे चारही पुत्र शहीद झाले. औरंगजेबाच्या आदेशाने मोगल सेनेने या वीर पुत्रांना फक्त सहा आणि नऊ वर्षांच्या कोवळय़ा वयात हौतात्म्य दिले, हा इतिहास आहे. तेव्हा औरंगजेब हा क्रूर शासक नव्हता असे कसे म्हणायचे? पुन्हा बावनकुळय़ांचे ‘सन्माननीय औरंगजेबजी’ प्रकरण पंतप्रधान मोदींजी यांनाही न पटणारे आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान सहन करणारेच ‘औरंगजेबजी’ यांचा सन्मान करू शकतात’ असा टोलाही राऊतांनी बावनकुळेंना लगावला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात