रत्नागिरी, 3 जून : निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या तसेच विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडले. यात 4 जण जखमी झाले आहे. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही. तसेच नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून नुकसानीबाबत 2 दिवसात भरपाई रक्कम शासकीय नियमांप्रमाणे दिली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. हे चक्रीवादळ जिल्ह्यातून पुढे सरकले असून पाऊस थांबताच नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरीत डिझेल वाहतूक करणारी एक बोट भगवती बंदरात होती. वा-याच्या वेगाने जहाजाचा अँकर तुटल्याने ती भरकटत पांढरा समुद्रापर्यंत आली. हे जहाज किना-याला आणली असून यावरील 13 खलाशांना वाचविण्यात यश आले आहे. हे खलाशी डिझेल पुरवठा करून परतण्यासाठी निघाले, परंतु वादळाच्या सुचनेमुळे थांबले होते. या प्रवाशांमध्ये 10 भारतीय असून 3 परदेशी आहेत. यामुळे या सर्वांना क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅब घेतले जातील. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असे सामंत म्हणाले. हे जहाज खडकावर आदळून त्याला छिद्र पडल्याने वापरून झालेले इंजिन ऑइल सांडले, परंतु धोका नाही. बोट महिनाभर येथेच राहील असे ते म्हणाले. मंडणगड आणि दापोली तालुक्यात मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती तेथील विभागीय अधिकाऱ्यांनी दिली आहे असे त्यांनी सांगितले. चक्रीवादळाने दिशा बदलल्याने मुंबईवरील धोका कमी झाला असला तरी पुणे आणि त्यापुढे जाणाऱ्या इतर जिल्ह्यांना धोका कायम असल्याची माहिती समोर आली आहे. हे वाचा- मुंबईचा धोका टळला; चक्रीवादळाची दिशा आता पनवेल, कर्जत, खोपोली, नाशिक मार्गे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







