मुंबई, 25 डिसेंबर : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीचा राज्यातील 30 लाख 57 हजार शेतकऱ्यांना फायदा मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ‘21 हजार 200 कोटी रुपये कर्जमाफी संदर्भात वाटप केले जाणार आहे. तसंच 2 लाख रुपयांचा वरती कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना देखील लवकरच दिलासा देणार,’ अशी घोषणा छगन भुजबळ यांनी केली आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या सरकारनं अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची कर्जमाफी होणार आहे. पण विरोधकांनी सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची आठवण करून देत विश्वासघाताचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्जमाफीला ‘महात्मा फुले कर्जमाफी’ असं नाव देण्यात आलं आहे. कशी असेल राज्य सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी? सरकारने 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करताना शेतकऱ्यांची कर्जाबरोबर कागदपत्रांच्या ओझ्यातूनही मुक्तता करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मार्च 2020 पासून या योजनेला सुरुवात होणार आहे. जाणून घेऊयात नेमकी कशी आहे ही कर्जमाफी? - 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ होईल - 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचं कर्ज माफ - कुठलाही फॉर्म भरण्याची गरज नाही - कर्जाचे पैसे थेट खात्यात जमा होणार - मार्चपासून कर्जमाफीची अंमलबजावणी कर्जमाफीतील महत्त्वाचे मुद्दे - शेतकरी कर्जमाफी करताना आधार कार्डचा आधार - शेतकर्यांना कोणतीही अट नाही - मंत्री, आमदार, खासदार, शासकीय कर्मचारी यांना कर्जमाफी मिळणार नाही - मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांना लाभ मिळणार - कर्जमाफीसाठी शेतकर्यांना अर्ज करण्याची गरज नाही - बँकांकडून शेतकर्यांच्या खात्यांची माहिती घेणार - भाजप सरकारने केलेल्या कर्जमाफीपेक्षा मोठी कर्जमाफी असेल असा सरकारचा दावा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.