मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Nashik Special Report : आस फक्त विठुरायाची! संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ

Nashik Special Report : आस फक्त विठुरायाची! संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ

X
संतश्रेष्ठ

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी

कोरोनाचा 2 वर्षांचा काळ सरल्यानंतर यंदा राज्यातील अनेक पालख्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीला निघाल्या आहेत. सातपूर येथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी (Palkhi of Saint Shrestha Nivruttinath Maharaj) पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे.

पुढे वाचा ...

    नाशिक, 14 जून : "राम कृष्ण हरी... जय जय राम कृष्ण हरी... विठोबा रखुमाई... जय जय विठोबा रखुमाई..." या भक्तिमय वातावरणात संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखीने (Palkhi of Saint Shrestha Nivruttinath Maharaj) पंढरपुरकडे प्रस्थान केलेलं आहे. विठुरायाचा (Pandharicha Vitthal) गजर करत शेकडो भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. काल सायंकाळी नाथांच्या पलाखीचा सातपूर येथे मुक्काम होता. सर्व व्यवस्था त्याच ठिकाणी करण्यात आली होती. पुन्हा आज सकाळी पालखीने पंढरपुरच्या दिशेने मार्गक्रमण केले.

    या वर्षी पालखी सोहळ्यात महिलांचा देखील मोठा सहभाग दिसून आला. महिलाही हरिनामाचा गजर करत, ठेका धरत मोठ्या उत्साहाने वारीत सहभागी झालेल्या आहेत. मागील वर्षी कोरोनामुळे वारीवर मोठी बंधन आली होती. मात्र, या वर्षी बंधनं कमी असल्यामुळे विठुरायाच्या भक्त मंडळींमध्ये जणू ऊर्जा संचारली आहे. प्रशासनाकडून वारकऱ्यांच्या आरोग्याचीदेखील काळजी घेण्यात आली आहे. इतर आजारांसोबत कोविड चाचणी, लसीकरणाचीदेखील सोय करण्यात आली. प्रत्येक मुकामाच्या ठिकाणी नाश्त्याची, जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आता वारकऱ्यांना फक्त विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे.

    वाचा : Ashadhi Wari 2022 : संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी ‘या’ दिवशी पंढरपूरकडे करणार प्रस्थान; यंदाच्या आषाढी वारीचे नियोजन, वाचा सविस्तर

    पालखी ही २७ दिवसांत पंंढरपुरला पोहोचणार आहे. या पालखीच्या पायी वाटचालीत जी गावे येतात, त्यांना वारीचे वेळापत्रक पूर्वीच पाठविण्यात आले आहे. संत निवृत्तीनाथ महाराज पालखी चांदीच्या रथासह आषाढी एकादशीसाठी पंढरपुरकडे निघाली आहे. पंढरपुरमध्ये ९ जुलैला संत निवृत्तीनाथांची पालखी पोहोचेल. त्र्यंंबकेश्वर ते पंढरपूर पायी अंतर जवळपास ४५० किलोमीटर आहे. पालखीला जाऊन-येऊन असा एकूण ४९ दिवसांचा कालावधी लागणार आहे.

    ... असा आहे संत निवृत्तीनाथ पालखीचा मार्ग

    त्र्यंबकेश्वरहून निघालेल्या या पालखीचा पहिला मुक्काम सातपूर येथे झाला. त्यानंतर नाशिक, पळसे, लोणारवाडी असा प्रवास करून दातली येथे गोलरिंगण रंगणार आहे. त्यानंतर खंबाळे, पारेगाव, गोगलगाव, राजुरी, बेलापूर बु., राहुरी, डोंगरगण असा प्रवास करून अहमदनगर येथे संजीवन समाधी सोहळा रंगणार आहे. पुढे पालखी साकत, घोगरगाव, मिरजगाव, चिंचोली, कर्जत, कोरेगाव, रावगाव, जेऊर, कंदर, दगडी अकोले या मार्गाने जाऊन पुन्हा चांभारविहीर येथे गोलरिंगण भरणार आहे. पुढे पालखी करकंच, पांढरीची वाडी या मार्गाने जाऊन चिंचोली येथे चंद्रभागेत स्नान करण्यासाठी थांबेल. त्यानंतर वाखरी येथे रिंगण सोहळा होईल आणि मग शेवटी ही पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचेल.

    26 ठिकाणी पालखीचा मुक्काम

    या पालखीच्या मार्गावर 26 ठिकाणी दिंडीचा मुक्काम राहणार आहे. त्यामध्ये सातपूर, नाशिक, पळसे, लोणारवाडी, खंबाळे, पारेगाव, गोगलगाव, राजुरी, बेलापूर बु., राहुरी, डोंगरगण, अहमदनगर, साकत, घोगरगाव, मिरजगाव, चिंचोली (काळदाते), कर्जत, कोरेगाव, रावगाव, जेऊर, कंदर, दगडी अकोले, करकंच, पांढरीची वाडी, चिंचोली या ठिकाणी हा मुक्काम राहणार आहे. या मुक्कामाच्या ठिकाणी संबंधित गावकरी तसेच दानशूर लोकांकडून वारकऱ्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. या मुक्कामाच्या ठिकाणी किर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम पार पडतील.

    चार ठिकाणी रंगणार रिंगण सोहळा

    या दिंडी सोहळ्यात हा नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो. या दिंडीच्या मार्गावर पहिले रिंगण दि. 17 जूनला सिन्नर तालुक्यातील दातली येथे होणार असून, हे गोल रिंगण असणार आहे. त्यानंतर 1 जुलैला धांडे वस्ती (जि. अहमदनगर) येथे उभे रिंगण होणार आहे. दि. 6 जुलैला चांभारविहीर येथे गोल रिंगण सोहळा होणार आहे. दिंडीच्या मार्गावरील शेवटचा रिंगण सोहळा वाखरी येथे होणार आहे. याच प्रवासात दि. 25 जूनला अहमदनगर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांचा संजीवन समाधी सोहळा सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत साजरा केला जाणार आहे.

    वाचा : पाऊले चालती पंढरीची वाट! गजानन महाराजांची पालखी निघाली विठुरायाच्या भेटीला, अकोल्यातील वारकऱ्यांचा पहा सुंदर VIDEO

    १३ जुलैला पालखी परतीच्या मार्गावर

    या पालखीच्या मार्गावर रोज साधारण 20 किलोमीटर पायी प्रवास केला जातो. रात्री नियोजित असलेल्या ठिकाणी मुक्काम करत दिंडी सत्ताविसाव्या दिवशी पंढरपूरात पोहोचेल. या संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचा मुक्काम पंढरपूरला संत निवृत्तीनाथ मठात राहणार आहे. विठुरायाच्या आणि रुख्मिणी देवीच्या दर्शनानंतर पालखी 13 जुलैला त्र्यंबकेश्वरकडे परतीच्या मार्गाला लागेल. 18 दिवसांचा प्रवास करून 30 जुलैला पालखीचे त्र्यंबकेश्वरमध्ये आगमन होईल, अशी माहिती संस्थान कडून देण्यात आली आहे.

    First published:

    Tags: Wari