विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक, 4 एप्रिल : द्राक्षांची पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची जगभरात ओळख आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात विविध देशात द्राक्षांची निर्यात केली जाते. यंदा देखील चांगल्या प्रमाणात द्राक्षांची निर्यात झाली आहे. मात्र, मध्येच झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे काहीसा फटका उत्पादनावर बसला आहे. निर्यातक्षम द्राक्षांना प्रती किलो 60 ते 70 रुपये आणि देशांतर्गत प्रती किलोला 23 ते 30 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. यंदा निर्यात चांगली नाशिक जिल्ह्यात यंदा द्राक्ष पिकाखाली जवळपास 63 हजार हेक्टर क्षेत्र आहे. दरवर्षी 30 ते 35 हजार शेतकऱ्यांची द्राक्ष निर्यातीसाठी कृषी विभागाकडे नोंदणी होत असते. यावर्षी 32 हजार शेतकऱ्यांनी 18 हजार हेक्टर क्षेत्राखाली द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी केलेली आहे. मागील वर्षी 3 एप्रिल पर्यंत युरोपियन देशांना साधारण 85 हजार मेट्रिक टन आणि नॉन युरोपियन देशांना 27 हजार मेट्रिक टन असे एकूण 1 लाख 12 हजार मेट्रिक टनाची निर्यात झाली होती.
यंदा युरोपियन देशांना 1 लाख 4 हजार मेट्रिक टन आणि नॉन युरोपियन देशांना 28 हजार मेट्रिक टन असे एकूण 1 लाख 33 हजार मेट्रिक टनाची द्राक्षांची निर्यात आतापर्यंत झालेली आहे. यावर्षी मागील वर्षी पेक्षा जास्त द्राक्ष निर्यात होतील अशी अपेक्षा होती. कारण अगोदर हवामान चांगल असल्यामुळे शेतकरी आनंदात होते. मात्र, नंतर अवकाळी पाऊस झाल्यामुळे मोठ नुकसान झालं. नाशिक जिल्ह्यात साधारण 1 हजार 700 हेक्टर वरील द्राक्षांचे साधारण 33 टक्के पर्यंत नुकसान झाले आहे. तरीही मागील वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत जास्त निर्यात झाली आहे आणि अजून एप्रिल महिन्यात 15 ते 20 हजार मेट्रिक टन पर्यंत द्राक्षांची निर्यात होऊ शकते, अशी माहिती नाशिक जिल्हा कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ यांनी दिली आहे. या देशात झाली द्राक्षांची निर्यात जर्मनी, नेदरलँड, पोलंड, ऑस्ट्रेलिया, रशिया, कॅनडा, सौदी, अरेबिया, तैवान, इंग्लंड, डेन्मार्क,स्वीडन, आयर्लंड, पोर्तुगाल, बेल्जियम, स्वित्झर्लंड, रोमानिया, स्पेन,फिनलंड, इटली, ग्रीस या देशांमध्ये प्रामुख्याने द्राक्षांची मोठी निर्यात झाली आहे.
शेतकऱ्यांना 3 महिन्यात लखपती करणाऱ्या आरोग्यवर्धक बिया, पाहा काय आहे लागवडीचा मंत्र, Video
ऐन भरात निसर्गाचा प्रकोप
द्राक्ष ऐन काढणीत अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मोठ नुकसान झालं. द्राक्षांना मोठ्या प्रमाणात तडे गेले त्यामुळे बाजारभाव कोसळले. काही भागात तर पावसाने द्राक्षांच्या बागा पूर्णपणे झोडपून काढल्या त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. त्यात जर मण्यांना तडे गेले तर तो माल निर्यात करता येत नाही. मग तो कमी भागात बाजारात विकावा लागतो. यंदा पावसाने अचानक हजेरी लावली अन्यथा उत्पादन यावर्षी चांगल होतं ,अशी प्रतिक्रिया दिंडोरीचे द्राक्षे उत्पादक तुषार घडवजे यांनी दिली आहे.