नाशिक, 21 मे : साधारण मे महिना म्हटलं की, राज्यातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा (Water Crisis) सामना नागरिकांना करावा लागतो. ही परिस्थिती ज्या भागात पाण्याची धरण (Water Dam) संख्या कमी आहे, त्या भागात अधिक जाणवत असते. मात्र, सध्या ज्या भागात धरण संख्या अधिक आहे, त्या भागातही पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपुरी तालुका (Igatpuri) नाशिक जिल्ह्याची तहान भागवण्यास मदत करतो. इतकेच नव्हे तर मुंबईसारख्या मोठ्या महानगराची तहानही भागवतो. धरणाचे माहेरघर म्हणूनही हा तालुका ओळखला जातो. मात्र, धरणाचे माहेरघर असलेल्या या इगतपुरी तालुक्यातील नागरिकांना सध्या एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. (Water Crisis in Igatpuri) धरण उशाला आणि कोरड घशाला - आज याच इगतपुरीतील काही गावांची पाड्यांची अवस्था “धरण उशाला आणि कोरड घशाला”, अशी झाली आहे. इथल्या महिला, लहान मुले दिवसभर इतरत्र पाण्याच्या शोधात वणवण करताना दिसत आहेत. त्यातही कधी गढूळ तर कधी दुर्गंधीयुक्त पाणीच नशिबाला येते. इथल्या पाड्यांची अवस्था इथले स्थानिक प्रशासन चांगलीच जाणून आहेत. मात्र, तरीसुद्धा ही अवस्था पालटायला काहीच प्रयत्न होतांना दिसून येत नाहीये. . एकीकडे इगतपुरी नगरपरिषद मोठ्या थाटामाटाने 24 तास भावलीची पाणी योजना (Bhawali dam) इगतपुरीत चालू करत आहे. मात्र, असे असताना दुसरीकडे इगतपुरीतीलच कथरूवांगण (Kathurwangan) या आदिवासी पाड्याची वेगळीच व्यथा आहे. हात धुणे (Hand wash) तर सोडाच प्यायला एक घोट पाणी सुद्धा येथील बांधवांना मिळेनासे झाले आहे.
200 लोक वस्तीचा आदिवासी पाडा -
हा पाडा इगतपुरी नगरपरिषदेच्या हद्दीत येतो. सुमारे 27 वर्षांपूर्वी या पाड्याचा समावेश नगरपरिषदेत करण्यात आला. मात्र, इतका कालावधी लोटला गेला तरी इथली परिस्थिती जैसे थेच आहे. या पाड्यात एकुण 45 घरे आहेत. यात जवळजवळ 200 लोक वस्ती करुन राहतात. पाणीपुरवठ्याच्या नावाखाली नगरपरिषदेने सात वर्षांपूर्वी दोन नळ कनेक्शन दिले. जवळच एका जुन्या टाकीत हे पाणी साठवले जाते. 15 दिवसात एक वेळा जास्तीत जास्त 20 मिनिटे पाणी पुरवठा केला जातो, असे येथील आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे. तसेच सध्या तेही मिळत नसल्याचे सांगण्यात आले. पाण्यासाठी वणवण - मागील काही दिवसांपासून येथे तळेगाव येथील विहिरीतून पाणी सोडण्यात येते. मात्र, हे पाणी गढूळ, उंदिर मेलेले, साप मेलेले, आणि केस असलेले पाणी पुरविण्यात येत असल्याचे महिलांनी सांगितले. घडलेला प्रकार येथील रहिवाशांनी नगरपरिषदेचे नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी वर्गाला आणि आमदारांना सांगितला. मात्र, कोणतीही दखल घेतली गेली नाही. सध्या पाड्यावरील स्त्रिया 2 किलोमीटर रेल्वेरुळातून जीव धोक्यात घालुन महामार्गावर येथील हॉटेलमधून झिरपणारे पाणी ज्या रेल्वे हद्दीच्या मोरीत जमा होते, तेथून आणि पर्यायी महामार्गालगत असलेल्या गढूळ धक्क्यातून पायपीट करत, जीवावर खेळत पाणी आणत आहेत. हेही वाचा - Planting Hobby : पुण्यातील 77 वर्षांच्या आजीबाईंची कमाल, पाहा, त्या कुठे लावतात रोपे? हे पाणीही एका नैसर्गिक स्त्रोतांतून डबक्यात गढूळ पाणी (Contaminated water) उपलब्ध होत आहे. येथील आदिवासी (Tribal) बांधवांनी प्रशासनाने लक्ष्य द्यावे, अशी मागणी केली आहे. मागील अनेक वर्षांचा वनवास आता संपावा आणि प्रशासनाने इकडे लक्ष्य द्यावे, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे. तसेच मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन (Aandolan) करण्याचा इशाराही येथील आदिवासी बांधवांनी दिला आहे. एकंदरीतच येथील आदिवासी बांधवांचा पाण्यासाठीचा हा वनवास कधी संपणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.