नागपूर, 19 एप्रिल : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला गालबोट लागलं. या सोहळ्यादरम्यान काही जणांचा उष्मघातामुळे मृत्यू झाला. त्यानंतर विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली. मात्र आता या प्रकरणाला वेगळ वळण लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात जे मृत्यू झाले ते उष्मघातामुळे नव्हे तर चेंगराचेंगरीमुळे झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट कर हा आरोप केला आहे. नाना पटोले यांच्या आरोपानंतर खळबळ उडाली आहे.
नेमकं काय म्हणाले नाना पटोले? महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेले मृत्यू हे चेंगराचेंगरीमुळे? खोके सरकार नक्की काय लपवतंय? या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मी राज्यपाल रमेश बैस यांना हे सरकार बरखास्त करण्याची विनंती करतो असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. सोबतच त्यांनी या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. नेमकं काय आहे प्रकरण?
महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेले मृत्यू हे चेंगराचेंगरीमूळे? खोके सरकार नक्की काय लपवतंय?
— Nana Patole (@NANA_PATOLE) April 19, 2023
या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे. मी राज्यपाल रमेश बैस यांना हे सरकार बरखास्त करण्याची विनंती करतो. pic.twitter.com/KP1jxrKVFW
दोन दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला लाखोंच्या संख्येनं श्री सदस्यांनी हजेरी लावली होती. मात्र या सोहळ्याला गालबोट लागलं. सोहळ्याला उपस्थित असलेल्या काही नागरिकांचा उष्मघातामुळे मृत्यू झाला. यावरून आता काँग्रेसने सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. उष्मघातामुळे नाही तर चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.