नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा/कल्याण, 13 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. अनैतिक संबंधातून हत्या केल्याच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता भंडारा जिल्ह्यातू एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक व्यक्ती पहिले लग्न झाले असताना दुसरे लग्न करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, याचवेळी त्याची पहिली पत्नी मुंबईच्या लग्नमंडपात धडकली. यानंतर भंडाऱ्याचा मासळच्या तरुणाचा हा डाव समोर आला. यावेळी पाहुण्यांची तारांबळ उडाली होती. घरी पत्नी आणि मुलगा असताना दुसऱ्या लग्नाचा डाव रचला जात होता. मात्र, याच वेळी पहिली पत्नी थेट लग्नमंडपात धडकली. त्यामुळे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांची एकच-तारांबळ उडाली. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील तरुणाचा हा पराक्रम मुंबईच्या कल्याण येथे उघडकीस आला. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खेमराज बाबुराव मुल (40, रा. मासळ, ता. लाखांदूर) हा पेंटचा व्यवसाय करतो. 15 वर्षांपूर्वी प्रेमसंबंधातून गावातीलच मुलीसोबत त्याचे लग्न झाले होते. काही दिवस पत्नीसोबत गोडीगुलाबीने राहिला. त्यांना मुलगाही झाला. मात्र, काही दिवसांतच त्यांच्यात बेबनाव सुरू झाला. पत्नीविरोधात घटस्फोटाची केस न्यायालयात दाखल केली. हेही वाचा - जावयाने सासूला पळवल्याच्या केसमध्ये नवा ट्विस्ट; आधीपासूनच सुरू होतं प्रकरण, म्हणून लेकीसोबत… हे प्रकरण न्यायालयात असतानाच दुसऱ्या लग्नाची तयारी चालवली. पत्नीला हा प्रकार कळला असता लग्नाची तारीख माहीत करून घेत पतीचा डाव उधळण्यासाठी ती विवाहस्थळी मुलगा, भाऊ, बहिणीसह कल्याण (पूर्व) येथील दर्शन मॅरेज हॉलमध्ये धडकली. यातील वर-वधू लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज असताना पहिल्या पत्नीने पोलिसांच्या मदतीने लग्नाचा डाव उधळला आणि दुसरे लग्न करणाऱ्या पतीला पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी खेमराज मुल याला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्याविरुद्ध कल्याणमधील (मुंबई) कोळसेवाडी पोलिस ठाण्यात भादंवि 494, 511, 506 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, यावेळी पाहुण्यांचीही एकच तारांबळ उडाली होती.