नागपूर, 5 जून : लॉकडाऊनमध्ये शांत झालेलं नागपूर आता पुन्हा एकदा धुमसत असल्याचं चित्र आहे. नागपुरात संचारबंदी शिथिल होत असताना गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून खुनाच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. हत्या प्रकरणांच्या वाढत्या संख्येमुळे महाराष्ट्राची उपराजधानी असलेलं नागपूर गुन्हेगारांची राजधानी होत आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण गेल्या सात दिवसांमध्ये सहा खुनांच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे.
नागपुरात प्रामुख्याने 27 मे रोजी एमआयडीसी आणि सोनेगाव पोलीस ठाण्यांतर्गत खून, 29 मे रोजी पारडी पोलीस ठाण्यांतर्गत खुनाचा गुन्हा दाखल झाला. तर 1 जूनला लकडगंज पोलीस ठाण्यांतर्गत, तसंच 2 जूनला कोतवाली आणि 3 जूनला यशोधरानगमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मार्च महिन्यात संपूर्ण शहरात केवळ 5 खुनाच्या घटना घडल्या. मात्र गेल्या 24 तासांत शहरातील विविध ठिकाणी घडलेल्या चार हत्याकांडांनी उपराजधानी हादरली.
खुनांच्या वाढत्या घटनांनी नागपूरकरांमध्ये दहशतीचे वातावरण असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यशोधरानगरमध्ये गुंडांची, गोपालनगरमध्ये प्रेमप्रकरणातून युवकाची, हुडकेश्वरमधील राजापेठ भागात जुन्या वैमनस्यातून तरुणाची हत्या करण्यात आली. एम्प्रेस मॉलमागे एका इसमाचा संशयास्पदस्थितीत आढळून मृतदेह आला. बंदोबस्तात व्यस्त असणाऱ्या पोलिसांसमोर आता कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचेही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
हैही वाचा - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोना, कराचीतल्या लष्करी हॉस्पिटलमध्ये केलं दाखल
दरम्यान, लॉकडाऊनच्या आधीही महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गुन्ह्यांच्या संख्येमध्ये मोठी वाढ असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून पोलीस प्रशासनावर टीका करण्यात येत आहे. त्यातच आता लॉकडाऊन शिथिल होताच पुन्हा गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांवरील ताणही वाढणार असल्याचं चित्र आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.