मुंबई, 23 ऑगस्ट : शिवसेनेमध्ये (shivsena) बंडखोरी करणाऱ्या आमदारांवर कारवाईचे सत्र अजूनही सुरूच आहे. पक्षाविरोधात कारवाया केल्याचा ठपका ठेऊन शिंदे सरकारमधील मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि आमदार यशवंत जाधव ( Yashwant Jadhav) यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबद्दल सेनेच्या कार्यालयातून पत्रक काढले आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी करून मंत्री उदय सामंत आणि आमदार यशवंत जाधव हे शिंदे गटात सामील झाले होते. मागील काही दिवसांपासून उदय सामंत यांनी उघडपणे शिवसेनेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अधिवेशनामध्ये उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली होती. त्यामुळे शिवसेनेनं अखेरीस कारवाई केली आहे. यशवंत जाधव आणि उदय सामंत यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. काय म्हणाले होते उदय सामंत? ‘गद्दार या शब्दाची व्याख्या मला कळत नाही. त्यामुळे गद्दार या शब्दाची व्याख्या स्पष्ट झाली पाहिजे महाराष्ट्रासमोर, त्यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सांगताय की, आमची नैसर्गिक आघाडी नव्हती. ही आघाडी कशी झाली, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस जर एकत्र लढली असती तर काही म्हणण्याचे कारण नव्हते. पण शिवसेना आणि भाजप एकत्र लढली मतदारांनी आम्हाला संधी दिली. त्यानंतर भाजपशी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणे ही गद्दारी होत नाही का? असा सवाल सामंत यांनी उपस्थितीत केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







