मुंबई, 11 सप्टेंबर : शिवसेना आणि शिंदे गटामध्ये न्यायालयीन लढाई सुरू आहे. असं असताना सरन्यायाधीश उदय लळीत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) हे एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी हे संकेतांना धरून नाही, असं म्हणत आक्षेप घेतला आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला. त्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. अशातच मुंबईमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत यांचा मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा हजर होते.
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारच्या वैधतेची गंभीर सुनावणी सुरू आहे, असे असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मा. सरन्यायाधीश यांच्यासोबत एका व्यासपीठावर बसणे, हे संकेतांना धरून नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वाखाली देशातील न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी योग्य तो मार्ग मिळेल. त्यांचा गाढा अनुभव, नैपुण्य, ज्ञान यामुळे ते न्याय क्षेत्रासाठी निश्चितच दीपस्तंभ ठरतील या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीशांचं कौतुक केलं. ‘सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नियुक्तीचे आपल्या मनात आनंद आणि अभिमानाची भावना आहे. कमीत कमी वेळात कामकाज अधिक वेगानं व्हावं आणि न्यायव्यवस्थेची चाके वेगाने फिरावीत यादृष्टीने सरन्यायाधीश उदय लळीत हे केवळ बोलून थांबले नाहीत तर त्यांनी ज्या पद्धतीनं कामाला सुरुवात केली आणि प्रकरणे निकाली काढली, ते पाहता निश्चितच देशातील न्यायदान वेगानं होईल यात काही शंकाच वाटत नाही. सरन्यायाधीश वेळोवेळी ज्या मार्गदर्शक सूचना करतील किंवा निर्णय देतील त्याची काटेकोर अंमलबजावणी राज्य सरकार करेल अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. मी उदयज लळीत यांना आज पहिल्यांदाच भेटलो आणि त्यांच्या शालीनता, नम्रता, सभ्यता यामुळे आपण प्रभावित झालो आहोत. कोकणात लळीत हा कीर्तन परंपरेतील एक लोककला असून या प्रयोगाच्या शेवटी कीर्तनकार देवाला गाऱ्हाणे घालतात. त्यात ते म्हणतात की, “आपापसातले कलह मिटोत, मनात किल्मिष ना उरो, निकोप मनाने व्यवहार चालोत”. कलह मिटविण्याची इच्छा प्रकट करणाऱ्या लळीतांचे नाव धारण करणाऱ्या लळीत आज न्यायदानाच्या सर्वोच्च पदावर पोहचले हा विलक्षण योगायोग असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले