मुंबई, 06 सप्टेंबर : मढ मार्वेच्या 1000 कोटींचा स्टुडिओ घोटाळ्या प्रकरणी (1000 crore studio scam of Madh Marve) काँग्रेसचे नेते अस्लम शेख (aslam shaikh) अडचणीत सापडले आहे. आता भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (aditya thackery) यांच्यावरही निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेचीही चौकशी करा, अशी मागणी सोमय्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मढ मार्वेच्या 1000 कोटींचा स्टुडिओ घोटाळ्या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 6, 2022
"₹1000 कोटींच्या मढ स्टुडिओ घोटाळ्यात, MVA सरकारचे पालकमंत्री अस्लम शेख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि BMC व पर्यावरण अधिकारी यांचा भूमिकेची चौकशी ताबडतोब सुरू करावी मागणी केली@BJP4Maharashtra pic.twitter.com/YIi2Z7onAC
1000 कोटींच्या मढ स्टुडिओ घोटाळ्याची चौकशी ताबडतोब सुरू करावी, MVA सरकारचे पालकमंत्री अस्लम शेख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा भूमिकेची चौकशी करावी आणि घोटाळ्यात गुंतलेले पर्यावरण आणि BMC अधिकारी यांचे निलंबन/ट्रान्स्फर करावे अशी मागणी, किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि सोमय्या वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. “अनिल परबांनी दापोलीत समुद्रात जसं रिसॉर्ट बांधलं तसंच मढमध्ये कोरोना काळात माजी मंत्री अस्लम शेख यांच्या आशीर्वादानं मोठमोठी बांधकामे उभी राहिली आहेत. समुद्रात सर्व नियमांचं उल्लंघन करुन अशी बांधकामे केली जात आहेत. जवळपास 200 कोटींचा घोटाळा या ठिकाणी आहे. थेट समुद्रात स्टुडिओ आणि इतर बांधकामे केली जात आहेत”, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे अस्लम शेख यांच्या पाठीमागे देखील ईडीचा ससेमिरा लागणार की काय? अशा चर्चा रंगली होती. मध्यंतरी, अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची विधान भवनातील कार्यालयात जाऊन भेट घेतली होती. त्याआधी शेख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. भाजप नेते मोहित कंबोज आणि अस्लम शेख हे एकत्र देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी त्यांच्या सागर या बंगल्यावर एकाच कारने गेले होते. त्यामुळे शेख यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती. पण, आता भाजपने शेख आणि आदित्य ठाकरेंविरोधात आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे.