बेळगाव, 6 मार्च : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी सीमाभागावर वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळला आहे. दरम्यान, महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर अजून तोडगा निघाला नसताना आमदार धीरज देशमुख यांच्या एका कृतीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. बेळगावमध्ये जाऊन धीरज देशमुख जय कर्नाटक म्हणाले आहेत. नेमकं काय घडलं? बेळगावातील राजहंसगड येथील पुतळा अनावरण कार्यक्रमात आमदार धीरज देशमुख यांनी कर्नाटकचे गोडवे गायले आहेत. भाषण संपवताना त्यानी जय महाराष्ट्र म्हणून संपवले. मात्र, पुन्हा डायसवर येऊन जय बेळगाव जय कर्नाटक म्हणाले. आमदार धीरज यांनी पुन्हा डायसवर येऊन जय बेळगाव जय कर्नाटक म्हटल्याने सीमावासीयांच्या भावना चांगल्याच दुखावल्या गेल्या आहेत.
धीरज देशमुखांनी म्हटलं जय कर्नाटक’ pic.twitter.com/jI6lV3TIUN
— ram rajesh patil (@RamDhumalepatil) March 6, 2023
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अनावरणाच्या या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून सतेज पाटील, संभाजीराजे छत्रपती आदी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच धीरज देशमुख यांनी हे वक्तव्य केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक घेऊनही सीमाभाग धगधगतच आहे. डिसेंबर महिन्यात सीमावासियांचा महामेळावा हाणून पाडत कानडी दडपशाही सीमावासीयांवर केली. याचे पडसाद लोकसभा आणि विधानसभेतही उमटले होते. तर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर सीमावसीयांनी त्याचे स्वागत करत सीमावासीयांचा त्रास कमी होईल, अशी आशा व्यक्त केली. मात्र, त्यांचा काही संघर्ष अद्याप संपलेला नाही.