बुलडाणा, 21 जुलै : राज्यभरात दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटनेनं आंदोलन पुकारले आहे. 20 तारखेपासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आज बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं चक्क बैलाला दूधाने आंघोळ घालून सरकारचा निषेध केला आहे. सरकारने दुधाचा दर वाढवून प्रति लिटर दुधाला 10 रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर रस्त्यावर उतरली आहे. बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी चक्क बैलांना दुधाची आंघोळ घालून आंदोलन केले आहे. सरकारने दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्यावे, दूध पावडरला प्रति किलोला 50 रुपये अनुदान द्यावे आणि तुप, दूध पावडर, व बटर यावरील जीएसटी कमी करावा अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे.
सरकारने राजू शेट्टी यांच्या दूध बंद आंदोलनाची दखल न घेतल्यास देशाला लागणारे अन्न धान्य बंद करावे लागेल असा इशारा या आंदोलनातून सरकारला देण्यात आला आहे. राजारामबापू दूध संघाचा एक टँकर फोडला दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज दूध आंदोलन पेटले आहे. पहाटे पुणे बंगळुरू हायवे वर दुधाचा टँकर फोडला तर कसबे डिग्रजहुन मुंबईकडे चाललेला राजारामबापू दूध संघाचा टँकरही स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी फोडला आहे. दुधाला योग्य असा भाव मिळावा यासाठी हे आंदोलन आजपासून सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाची ठिणगी मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळत आहे. माळशिरसमध्ये दुधाची वाहतूक रोखली माळशिरस तालुक्यात दररोज 4 लाख 50 हजार लिटर दूधाचे उत्पादन होते. दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर आज पहाटे माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अकलूज- इंदापूर रोडवर टायर पेटवून पुणे आणि मुंबई कडे जाणारी दूध वाहतूक रोखली आहे.