बीड, 22 फेब्रुवारी : एकीकडे राज्यात कोरोनाचं संकट घोंगावत असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे सामूहिक विवाह सोहळ्यात हजारोंची गर्दी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे, राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार प्रकाश सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती. या विवाह सोहळ्यात मास्क सोशल डिस्टंन्सिंग पाळण्यात आलेलं नव्हतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने या सामुदायिक विवाह सोहळ्यास परवानगी नाकारली असताना मिरवणूक आणि विवाह सोहळ्यास गर्दी करणं या प्रकरणी 25 जणांविरोधात माजलगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सामूहिक विवाह सोहळ्यात गोरगरिबांच्या मुला-मुलीचं लग्न झालं असलं, तरीही या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने हजारोंची गर्दी झाल्याने कोरोनाच्या संकट काळात मोठा धोका निर्माण झाला आहे. तसंच गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त माजलगाव शहरात शिव सेवाभावी संस्थेच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात सात जोडपी विवाहबद्ध झाली. या विवाह सोहळ्यास महिला लहान मुलांचीही उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातून भव्य रॅली काढून मिरवणूकही काढण्यात आली होती. यावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे यांचं शाही स्वागत करण्यात आलं. या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी जमा झाली होती. या गर्दीमध्ये कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचं चित्र दिसून आलं.
लग्नसोहळ्यात गर्दी झालेली असताना, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सामुदायिक विवाह सोहळा घेताना सर्व नियमांचं पालन केलं असल्याचं संयोजकांच्यावतीने सांगण्यात आलं आहे. मात्र प्रत्यक्षात वेगळं चित्र होतं. गर्दी मोठया प्रमाणात जमा झाल्याने सूचनांचे पालन झालं नसल्याचं दिसून आलं.
तसंच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त सात जोडप्यांचा विवाह सोहळा घेण्यात आला. मात्र मोठ्या प्रमाणात विवाहांची नोंदणी झाली होती बाळू ताकड घेत असलेला हा उपक्रम चांगला आहे यात कोरोनाचे नियम पाळून हा उपक्रम घेतला असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी सांगितलं.
या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून गोरगरिबांच्या कुटुंबातील विवाह शिव सेवाभावी संस्थेच्यावतीने मोफत लावून देण्यात आलं असलं तरीही याठिकाणी जमवलेली गर्दी कोरोणाला निमंत्रण देणारी होती. सामाजिक उपक्रम करत असताना कोरोनाच्या संकटाचं भान ठेवणं तितकंच महत्त्वाचं होतं. संयोजकांकडून नियम पाळण्यात आले नाहीत. तसंच परवानगी नसताना रॅली काढणं आणि सामूहिक विवाह सोहळ्यात गर्दी जमवणं यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याने 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राठोड यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Beed news, Corona, Corona vaccine, Covid19, India, Maharashtra, Marriage, World After Corona