सांगली, 26 मार्च : इस्लामपूर सांगली मार्गावर भीषण अपघात (Major accident on Islampur Sangli road) झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, चौघांचा जागीच मृत्यू (4 people died in accident) झाला आहे. सर्व मृतक हे एकाच कुटुंबातील आहेत. या अपघातात एक सात वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. अपघात मृत झालेले कराड तालुक्यातील आगाशिवनगर, मलकापूर येथील आहेत. वास्तूशांतीसाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील पोळ कुटुंबीय हे आपल्या नातेवाईकांकडे वास्तूशांतीसाठी निघाले होते. त्याच दरम्यान त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. पोळ कुटुंबीयावर काळाने घाला घातला. या अपघाताची माहिती मिळताच आगाशिवनगरसह परिसरावर शोककळा पसरली आहे.
नेमका अपघात कसा झाला? सांगली ते इस्लामपूर मार्गावर हा अपघात झाला आहे. समोरील कारने अचानक ब्रेक लावल्याने कार थांबण्याचा प्रयत्न करत असतानाच पाठीमागून डंपरने कारला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, गाडीतील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एक चिमुकली गंभीर जखमी झाली आहे.
पुढे असलेली कार आणि मागून वेगाने येणारा डंपर या दोन्ही गाड्यांच्या मधोमध पोळ कुटुंबीयांची गाडी आली. दोन्ही गाड्यांच्या मध्ये गाडी दबली गेल्याने गाडीतील पोळ कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला.
2 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्याच्या कारला भीषण अपघात अमरावती-नागपूर महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्याच्या कारला समोरून येणाऱ्या वेगवान पिकअपने जोरदार धडक दिली आहे. या दुर्दैवी घटनेत कार चालकासह एका 50 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारमधील अन्य तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दोन दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा देखील समावेश आहे. संबंधित सर्वांना सेवाग्राम येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आलं आहे. पिंपळखुंटा येथील रहिवासी असणाऱ्या मीराबाई भीमराव बेदुरकर (वय 50) आणि कारचालक गौरव लक्ष्मण ठवकर (वय 23) असं अपघातात मृत पावलेल्या दोघांची नावं आहे. तर वैभव सुरेश गायके (वय 25) आणि तेजस्विनी रमेश बाभळे या नवदाम्पत्यासह नेहा दादाराव बेदूरकर हे तिघे गंभीर जखमी झाले आहे.