ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 17 एप्रिल: अवकाळी पावसाने झोडपल्याने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजीपाला मातीमोल झाला असून टोमॅटोचा लाल चिखल झाला आहे. जिल्ह्यात रविवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. मध्यरात्रीनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये मोठे नुकासन झाले असून शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी होत आहे. लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा लातूर जिल्ह्यातील लातूर शहर, औसा, निलंगा, वलांडी परिसरात सायंकाळच्या सुमारास वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणच्या लाईट गुल झाले आहेत. दिवसभर कडाक्याची ऊन होते त्यानंतर दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी पाऊस पडल्यामुळे उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे. मात्र शेतीला या पावसाचा फटका बसला आहे.
भाजीपाला आणि फळबागेचे नुकसान लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बिबराळ शिवारात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामध्ये टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाल आहे. मारोती जन्मले यांची पाच एकर तर दिनकर जाधव यांचा दोन एकर टोमॅटोचा प्लॉट पूर्णपणे वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे उद्ध्वस्त झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी टोमॅटो आता बांधावर फेकून दिले आहेत. तात्काळ पंचनामे करण्याची मागणी त्यांनी केली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी आणि आजूबाजूचा परिसर तसाच रेणापूर तालुक्यातील पानगाव आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागेचे क्षेत्र आहे. तसेच जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणामध्ये केसर आंब्याची बागही आहे.. या पावसामुळे द्राक्षबाग आणि आंब्याच्या बागेचे नुकसान झाल्याचे पहावयास मिळत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र, अशी असेल स्थिती पाहा PHOTOS शेतकऱ्यांना अवकाळीने घेरले काही ठराविक अंतरानंतर सातत्याने होत असलेल्या अवकाळी पावसामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे. शेतीचे अर्थकारण या अवकाळी पावसाने मोडून टाकले आहे. बाजारात शेतमालाला उठाव नाही आणि त्यातच होणारे हे नुकसान शेतकऱ्याची आर्थिक घडी तोडणारी आहे.