लातूर, 29 जुलै, सचिन सोळुंके : लातूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उकळतं पाणी अंगावर पडल्यानं दोन सख्ख्या बहिणी गंभीर जखमी झाल्या आहेत. योगेश्वरी शेळके वय वर्ष बारा आणि महेश्वरी शेळके वय वर्ष आकरा अशी या मुलींची नावं आहेत. लातूर जिल्ह्यातील कव्हा गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातामध्ये योगेश्वरी 90 टक्के तर महेश्वरी 60 टक्के भाजली आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, लातूर जवळील कव्हा या गावातील महादेव शेळके हे लातूर येथील आडत बाजारात हमालीचं काम करतात. सकाळी लवकर कामाला जावे लागते म्हणून त्यांनी एका बाधलीमध्ये पाणी तापवण्यासाठी ठेवले होते. योगेश्वरी आणि महेश्वरी या रात्री तिथेच अभ्यास करून झोपल्या होत्या. सकाळी आपल्यासोबत काय होणार आहे, याची किंचितही कल्पना त्यांना नव्हती. मात्र अचानक ज्या बाधलीमध्ये उकळत पाणी होतं त्या बाधलीखालचा पाटा निसटल्यानं हे पाणी या दोघींच्या अंगावर पडलं. त्या दोघीही किंचाळतच उठल्या. दोन्ही बहिणींना तातडीनं लातूरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत योगेश्वरी 90 टक्के तर महेश्वरी 60 टक्के भाजली आहे. त्यांच्या उपचारासाठी बारा ते पंधरा लाखांपर्यंत खर्च येणार असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.