साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 6 एप्रिल : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या वन विभागाच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. या परीक्षेत यशस्वी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रवास हा प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या सभोवतालच्या परिस्थितीवर मात करत, जिद्दीनं अभ्यास करत, लक्ष्यावरील फोकस हटू न देता हे यश मिळवलंय. कोल्हापुरातील एका महिलेनंही आपली आवड, सर्व जबाबादारी सांभाळत रेंज फॉरेस्ट ऑफिसर होण्याचं स्वप्न खरं केलंय. कसा झाला प्रवास? कोल्हापुरातील जयसिंगपूर या ठिकाणच्या मोना विजय बेलवलकर असे या महिलेचे नाव आहे. मोना यांनी या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात तिसरी येण्याचा बहुमान मिळवलाय.या यशामुळे त्यांच्या घरातील सर्व सदस्य, तसंच मित्र परिवारामध्ये आनंदाचं वातावरण आहे. मोना यांचे शालेय शिक्षण जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिर, जयसिंगपूर इथे झाले आहे. तर महाविद्यालयीन शिक्षण जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर या ठिकाणी त्यांनी पूर्ण केले. तर सांगलीच्या कस्तुरबा महाविद्यालयातून बीएससीची पदवी त्यांनी पूर्ण केली. त्या बारावीला असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर मोना यांच्या आई आणि मोठ्या बहिणीनं त्यांना धीरानं वाढवलं. वडिलांनी सलून चालवून शिकवलं, मंगेश झाला वन अधिकारी! वडिलांची इच्छा पूर्ण ‘मोनानं अधिकारी व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. आज ते हयात नसले तरी त्यांच्या मनातील इच्छा लेकीनं पूर्ण केली आहे. त्यामुळे परिवारातील प्रत्येकाला आनंद झालाय,’ अशी भावना मोना यांच्या आई मृदुला यांनी व्यक्त केली. ‘माझ्या यशात आई आणि मोठ्या बहिणीचा मोठा वाटा आहे. 2018 पासून मी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. साधारण 2 वर्षांपूर्वी सहाय्यक प्राध्यापिका म्हणून नोकरीही केली. त्यानंतर 2021 मधील जाहिरातीनुसार झालेल्या परीक्षेत माझी रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवड झालीय.’ असं मोना यांनी सांगितलं.
विद्यापीठाकडून पुरस्कार मोना यांनी पदवीचं शिक्षण घेत असताना एनसीसीच्या माध्यमातून दिल्ली आणि आसाममध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आहे. एनसीसीकडून त्यांना राष्ट्रीय पातळीवरील कांस्य पदकही मिळालय. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाकडून महाराणी ताराराणी पुरस्कारानंही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.