कोल्हापूर, 16 ऑगस्ट : कोल्हापूरमध्ये मागील वर्षी महापुरामुळे होत्याचं नव्हतं झालं होतं. आज वर्ष उलटून गेल्यानंतर पुन्हा एकदा महापुराचे संकट घोंघावत आहे. कोल्हापूर, सांगलीतील चांदोली आणि साताऱ्याच्या कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे पूर स्थिती निर्माण होण्याची चिन्ह आहे.
मागी वर्षी पंचगंगा, कृष्णा नदीने घेतलेल्या रौद्ररुपामुळे पश्चिम महाराष्ट्रावर मोठे संकट आले होते. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे नद्या तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पाणी पातळी वाढल्यामुळे धरणांमधून विसर्ग सुरू झाला आहे. कोल्हापूर, चांदोली आणि कोयना धरणातून सुरू झाला आहे. या तिन्ही धरणांमधून जवळपास 45 हजार क्यूसेक विसर्ग होणार असल्याने, कोल्हापूर, सांगली भागात पूर पस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. सध्या अलमट्टी धरणामधून विसर्ग सुरू आहे, पण जर पाऊस वाढला तर स्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.
सध्या कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरणात सध्या 90 टीएमसी पाणीसाठा आहे. धरणात 60 हजार क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे.आज सकाळी 8.30 वाजता धरणातून 25 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
सध्या कोयना धरणातून 11000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. त्यानंतर दिवसभरात त्यात वाढ होऊ शकते. कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तर सांगलीमध्ये सांगलीत कृष्णा नदीची कमी झालेली पाणी पातळी पुन्हा झपाट्याने वाढली आहे. आता आयर्विन पुलावर 23 फुटांवर पाणी पातळी पोहचली आहे. 2 दिवसात 10 फूट पाणी पातळी वाढली आहे.
कृष्णा नदी पात्र परिसरात 2 दिवसापासून सुरू असलेला पाऊस, कोयनेतला आणि चांदोली धरणातून विसर्ग सुरू असल्याने पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.