मुंबई, 14 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा दारूण पराभव केला, यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा पराभव भाजपच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा आहे. विरोधी पक्ष हा जिंकत नसतो तर सत्ताधारी हरत असतात, आपलं कोण वाकडं करू शकतो? अशा विचाराचा जो असतो, त्याचा हा पराभव आहे. जनतेला कधीही गृहित धरू नये, हा बोध या निकालातून सगळ्यांनी घ्यावा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. ‘विरोधी पक्ष का कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हरत असतात. हा पराभव स्वभावाचा पराभव आहे, वागणुकीचा पराभव आहे. आपलं कोण वाकडं करू शकतं, असा जो विचार असतो त्याचा हा पराभव आहे. जनतेला, लोकांना कधीही गृहित धरू नये, हा बोध या निकालातून सगळ्यांनी घ्यावा,’ असा टोला राज ठाकरेंनी लगावला. राज ठाकरेंच्या या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
‘घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो. जालंधरमध्ये आम आदमी पार्टी का जिंकली आणि काँग्रेस का हरली? राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जालंधरमध्ये चालली नाही का? उत्तर प्रदेशमधल्या सगळ्या नगर पालिका महानगरपालिका महापौर निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं, त्या राहुल गांधींची भारत जोडो यात्रा कुठे गेली होती? त्यावर राज ठाकरे बोलतील का?, त्यामुळे मै भी जिंदा हूं, हे दाखवण्यासाठी त्यांची प्रतिक्रिया आहे, त्यांच्या प्रतिक्रियेला फार महत्त्व आम्ही देत नाही,’ असा पलटवार भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.