नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 26 एप्रिल: हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी लोकार्पण करण्यात आले होते. जलद गतीने प्रवास करण्यासाठी तयार झालेल्या या महामार्गाच्या वैशिट्यांची जेवढी चर्चा झाली त्यापेक्षा जास्त या मार्गावर होणाऱ्या अपघातांची झालीय. वाढत्या अपघातांमुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. याच अपघातांना नियंत्रण आणण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग काही उपाय योजना करत आहे. विशेष मोहीम समृध्दी महामार्गावर वाढते अपघात पाहता महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच घासलेल्या टायरच्या वाहनांना परत पाठवण्यात येत आहे. 10 ते 19 एप्रिलपर्यंत 35 वाहनांना जालना जिल्ह्यातून परत पाठविण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे, वाहनांचे टायर गुळगुळीत असल्याने अपघात होत असल्याचं समोर आले आहे. टायर घासलेले असल्याने वेगात वाहन चालवल्याने प्रवास करून अपघाताला आमंत्रण मिळत आहे.
वाहनांची तपासणी मोहिम जालना जिल्ह्यातून जाणारा समृध्दी महामार्ग प्रवासासाठी खुला झाल्यानंतर अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघातही वाढले आहेत. या महामार्गावर होणारे अपघात चर्चेचा विषय ठरल्यानंतर वाढते अपघात रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांची तपासणी मोहिम सुरू केली आहे. 10 ते 19 एप्रिलपर्यंत समृध्दी महामार्गावर धावणाऱ्या 464 वाहनांची तपासणी करून टायर घासलेल्या 35 वाहनांना महामार्गावरून परत पाठविण्यात आले. ही मोहिम पुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली. समृध्दीवर 41 वाहनांवर कारवाई समृध्दी महामार्गावरून प्रवास करतांना नियम पाळावाच लागणार आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी आरटीओ, रस्ते सुरक्षा पथक, महामार्ग पोलिस यांच्याकडून सध्या समृध्दी महामार्गावर विशेष लक्ष ठेवले जात आहे. जालना जिल्ह्यात आरटीओ कार्यालयाकडून लेन कटींगच्या 21, नो पार्कींगच्या 5, सीट बेल्ट नसलेल्या 7 तर रिफ्लॅक्टर नसलेल्या 8 अशा एकुण 41 कारवाया करण्यात आल्या आहेत.
Jalna News : ‘त्या’ घटनेनं घडवली क्रांती, जालना जिल्ह्यात निर्माण झालं शेततळ्यांचं गाव Video
समृध्दी महामार्गावर वाहने चालवितांना वेगमर्यादेचे पालन करायला हवे, घासलेल्या टायरमुळे अपघात झालेले आहेत. त्यामुळे वाहनचालकांमध्ये जनजागृती करून त्यांना घासलेल्या टायरची वाहने समृध्दी महामार्गावर आणू नये, अशी सूचना केली जाते. यानंतर वाहन आल्यास त्यांना परत पाठवले जाते. जालना जिल्ह्यात विशेष मोहिम राबविण्यात येत असून वाहनांची तपासणी करून वाहने परत पाठविण्यात आले आहेत, असंही विजय काठोळे यांनी सांगितले.