नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 26 एप्रिल: महाराष्ट्रातील शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. शेतीसाठी पाण्याची टंचाई असणाऱ्या मराठवाड्यात शेततळही काढली जात आहेत. जालना जिल्ह्यातील कडवचीला शेततळ्याचं गाव म्हणूनच ओळखलं जातंय. द्राक्ष बागायत असणाऱ्या या गावात तब्बल 500 हून अधिक शेततळी आहेत. विशेष म्हणजे गावातील प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वत:चे शेततळे आहे. शेततळ्यांचं गाव कडवची जालना शहरापासून अवघ्या 15 किमी अंतरावर असलेल्या कडवची गावात द्राक्ष उत्पादक शेतकरी अधिक आहेत. आपल्या द्राक्ष बागांना जगविण्यासाठी या गावातील शेतकऱ्यांनी तब्बल 500 पेक्षा अधिक शेततळ्यांची निर्मिती केलीय. आजघडीला या गावातील प्रत्येक शेतकऱ्याकडे एक किंवा दोन शेततळी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेततळी तयार करण्याची आवश्यकता या गावातील लोकांना भासण्यामागंही खास कारण आहे.
2012 च्या दुष्काळाचा फटका जालना जिल्ह्यातील द्राक्ष बेल्ट मधील कडवची हे महत्वाचे गाव आहे. या गावातील जवळपास सर्वच शेतकऱ्याकडे द्राक्ष बागा आहेत. 2012 मध्ये मराठवाडा विभागात मोठा दुष्काळ पडला होता. तेव्हा अनेक शेतकऱ्यांना आपल्या द्राक्ष बागा वाचविण्यासाठी धडपड सुरू केली. अनेकांनी टँकर ने पाणी पुरवठा करून द्राक्ष बागा जोपासल्या. मात्र एवढे करून देखील भीषण दुष्काळापेढे अनेक बागांनी माना टाकल्या. शेततळी तयार करण्यास झाली सुरुवात या परिस्थिती मधून धडा घेत पुढील वर्षीपासून शेतकऱ्यांनी शेततळी उभारण्यास सुरुवात केली. सुरुवातीला आघाडी सरकारच्या काळात 100 टक्के अनुदानावर अनेक शेतकऱ्यांनी शेततळ्यांची उभारणी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जलयुक्त शिवार योजना सुरू केली. या अंतर्गत मागेल त्याला शेततळे अशी घोषणा करण्यात आली. या योजनेचा लाभ गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी घेतला. सध्याच्या घडीला गावात पाचशे पेक्षा अधिक शेततळे असून याचे श्रेय गावकरी आणि कृषी विज्ञान केंद्र खारपुडी येथील शास्रज्ञ यांना जाते, असे गावचे माजी सरपंच देविदास क्षीरसागर यांनी सांगितले. घरातील तेलाची गरज भागवण्यासाठी पिता-पुत्रांनी शोधली आयडिया, तुम्हीही घेणार का आदर्श? Video दुष्काळात द्राक्षांना ट्रक्टरने पाणी माझ्याकडे एकूण आठ एकर जमीन आहे. त्यापैकी चार एकर द्राक्ष आहेत. गावातील प्रत्येक शेतकऱ्याकडे थोडी तरी द्राक्ष आहेच. 2012 मध्ये पडलेल्या दुष्काळात अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरने पाणी देऊन बागा वाचविल्या. यामुळे आमच्या गावात कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून बांध बांदिस्तीवर काम करण्यात आले. या अंतर्गत नद्या, ओढे यांचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात आले. तसेच शेततळे उभारणीसाठी मदत करण्यात आली. आज घडीला गावात 500 पेक्षा अधिक शेततळे आहेत, असे भरत क्षीरसागर यांनी सांगितले.

)







