नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 6 मे : मालमत्ता कर हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. हा कर नियमितपणे भरणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन मिळावं म्हणून जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायतीनं एक खास उपक्रम सुरू केलाय. जालनामधील रामनगर ग्रामपंचायतीनं मालमत्ता कर नियमित भरणाऱ्या गावकऱ्यांना एटीएम कार्ड दिलंय. या कार्डच्या माध्यमातून दररोज 20 लीटर शुद्ध पाणी मोफत दिलं जातंय. ग्रामपंचायतीनं सुरू केलेल्या या उपक्रमाचा गावकऱ्यांना मोठा फायदा होतोय. कशी सुचली कल्पना? रामनगरचे सरपंच गोपाळ मोरे यांनी ही कल्पना कशी सुचली याबाबत माहिती दिली. ‘आम्ही नुकतचं मोठ्या अपेक्षांनी निवडणूक जिंकली आहे. गावासाठी काहीतरी करायचे म्हणून आम्ही आदर्श गाव पाटोदा इथे अभ्यास दौरा केला. तिथं अनेक चांगले उपक्रम आम्हाला पाहायला मिळाले. यातील हा प्रयोग गावात सुरू करण्यासंबंधी ग्रामसभेत चर्चा झाली. ग्रामसभेतील चर्चेनंतर नियमित कर भरणाऱ्या व्यक्तींना पाण्यासाठी एटीएम कार्ड देण्याचा निर्णय आम्ही घेतला.
महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. तापर्यंत 40 नागरिकांना एटीएम कार्ड देण्यात आले आहेत. तर नियमित कर भरणाऱ्या आणखी 40 नागरिकांना कार्ड देण्यात येणार आहे. ज्यांना कार्ड दिले नाहीत ते नागरिक सुद्धा पाच रुपये मशीन मध्ये टाकून दहा लिटर पाणी घेऊ शकतात, अशी माहिती मोरे यांनी दिली. शेतकऱ्याची कमाल, सफरचंद शेती करून दाखवली,यंदा दीड लाखांची कमाई आमच्या ग्रामपंचायतीनं गावकऱ्यांसाठी अतिशय चांगली सुविधा सुरु केली आहे. पाच रुपयाच्या कॉईनमध्ये 10 लिटर तर एटीएम कार्ड वापरुन 20 लीटर शुद्ध पाणी आम्ही घेऊ शकतो. या योजनेचा लोकांना खूप फायदा होतोय, अशी भावना ग्रामस्थ वरद सोनुने यांनी व्यक्त केली. तर सरपंच, सर्व सदस्य आणि गावकऱ्यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना सहज शुद्ध पाणी उपलब्ध होत आहे.यापुढेही ग्रामपंचायत यापद्धतीचे कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी आर. यू. गोरे यांनी दिली.