जालना, 24 जुलै : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव जवळ येत आहे. महाराष्ट्रात हे दोन्ही सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. बाप्पाचे आगमन प्रत्येकाला सुखावणारे असते. या उत्सव काळात बाप्पाच्या मिरवणुकीतली ढोल पथकं सर्वांचं लक्ष वेधून घेतात. मुंबई, पुणे यासारख्या मेट्रो शहरात याची मोठी क्रेझ पाहायला मिळते. हीच क्रेझ आता छोट्या शहरात देखील दिसत आहे. जालना शहरात देखील मागच्या काही वर्षात अनेक ढोल पथकांनी जम बसवला आहे. ब्रम्हास्त्र हे जालना शहरातील पाहिले मानाचे पथक असून महिनाभरापासून ते आपली तयारी करत आहेत. जाणून घेऊया कशी सुरू आहे या पथकाची तयारी. मानाचे पथक! जालना शहरातील निलेश शर्मा यांनी या पथकाची स्थापना 2015 मध्ये केली. गुरुपौर्णिमेला दर वर्षी मिरवणूक निघते. या मिरवणुकीत ते मुंबई किंवा पुणे इथून ढोल पथक बोलवायचे. दरवेळी पथकाला इथं आणताना खूप कसरत व्ह्यायची यातूनच त्यांना आपल्या शहरातच पथक सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. 20 सदस्यांपासून त्यांनी पथक सुरू केले. आज त्यांच्या ब्रम्हास्त्र पथकामध्ये 150 लोक सहभागी आहेत. 120 पेक्षा जास्त वाद्यं त्यांच्याकडे आहेत. वकील, डॉक्टर, पत्रकार यांच्यापासून ते सामान्य गृहिणी अगदी पाच सहा वर्षांची मुलं देखील या पथकात सहभागी आहेत.
‘आमच्या ब्रम्हास्त्र ढोलपथकला नऊ वर्ष पूर्ण झालीत. या दरम्यानच्या काळात आमच्यासोबत खूप लोक जोडले गेलेत. आम्ही साईबाबा यांची पालखी आणि गणेशोत्सव करत असतो. राममंदिर चौकात दगडूशेठ हलवाई गणपती बसतो. याची पूर्ण व्यवस्था आम्ही पुणे पॅटर्नने करतो. सध्या तीन महिन्यांचा सराव सुरू आहे. सकाळी साडेसहा वाजेपासून सराव सुरू होतो. संध्याकाळी बाल पथकाची देखील प्रॅक्टिस होते, ’ असं पथकाचे व्यवस्थापक निलेश शर्मा यांनी सांगितले. एका भावुक क्षणी झाली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना! पाहा माहिती नसलेला इतिहास ‘ब्रम्हास्त्र ढोल पथकात मी मागच्या नऊ वर्षांपासून वाजवतो. सध्या मी मुलांना शिकवतो. आमच्या पथकात सहभागी व्हायचे असल्यास आमच्या पेजवर असलेल्या लिंक वर जाऊन नोंदणी करू शकता. आम्ही वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात देखील सहभाग घेत असतो. तसेच आमच्यातील उत्कृष्ट ढोल आणि ताशा वाजविणाऱ्या सन्मानित करतो. जालना शहरातील हे पहिले मानाचे पथक असल्याचे ज्ञानेश्वर म्हस्के यांनी सांगितले. मी मागील वर्षी पथकात सहभागी झाले. खूप छान वाटतं. प्रत्यक्ष मिरवणुकीत सहभागी होणे हा खूप भारी अनुभव असतो. ढोल वाजवत असताना सगळे ताण तणाव दूर होतात असा अनुभव या पथकाची वादक धनश्रीनं सांगितला