रवी जैस्वाल, प्रतिनिधी जालना, 4 जुलै : राज्यात दिवसेंदिवस दुचाकी तसेच चारचाकी वाहनाच्या अपघाताच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. नुकताच समृद्धी महामार्गावर झालेल्या खासगी बसच्या भीषण अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. यानंतरही राज्यात अपघाताच्या घटना समोर येतच आहेत. यातच आता जालना जिल्ह्यात एका दुचाकीसंदर्भात धक्कादायक घटना समोर आली. किक मारताच दुचाकीने पेट घेतला आणि बघता बघता संपूर्ण दुचाकी जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली. जालना तालुक्यातील रामनगर कारखाना येथे ही घटना घडली.
किक मारताच दुचाकीने पेट घेतल्याची घटना जालना मंठा रोडवरील रामनगरजवळ घडली. नेर येथील अजय राठोड हा तरुण आपल्या दुचाकीवर जालन्याहून गावाकडे जात होता. मात्र, रामनगर कारखान्याजवळ त्याची दुचाकी बंद पडली. म्हणून तरुणाने एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले. तरीदेखील दुचाकी सुरू होत नव्हती. यानंतर त्याने दुचाकीची किक मारली आणि त्याच क्षणी दुचाकीनं पेट घेतला. बघता बघता संपूर्ण दुचाकी डोळ्यादेखत जळून खाक झाली. या पेटलेल्या दुचाकीचा फोटोही समोर आला असून या घटनेची संपूर्ण परिसरात एकच चर्चा होत आहे. काल समृद्धी महामार्गावर घडला भीषण अपघात - समृद्धी महामार्गावर रोजच अपघात होऊन प्रवासी मृत्यूमुखी पडत आहेत. बुलडाणा येथील भीषण बस अपघातानंतर आज सलग तिसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. यात चालक पती ठार झाला असून पत्नी व मुलगा जखमी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जयपूर-भांबर्डा शिवारात काल पहाटे हा भीषण अपघात झाला. संभाजीनगरहून जालनाच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे कार मार्गाच्या डाव्या बाजूला जवळपास 30 फूट खोल कोसळली. अपघातात सुशीलकुमार थोरात यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी होते. त्यांच्यासोबत चार चाकीमध्ये असलेली त्यांची पत्नी व बाळ या अपघातात जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी संभाजीनगर येथे पाठवण्यात आले.