मुंबई, 17 जून : राज्यात मान्सूनचं (Monsoon Update) आगमन झाल्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये पावसाने अगदी जोरदार हजेरी लावली. मात्र, काही ठिकाणी अजून दर्शनही दिलं नाही. पाऊस लांबल्याने शेतकरी वर्ग चिंतेत शेतीची मशागत आणि पेरणी कधी होणार याच चिंतेत तो दिसत आहे. तर नाशिकसारख्या दुर्गम भागात पावसाळा सुरू होऊनही पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दरम्यान, पावसाच्या बाबतीत आता एक चांगली बातमी समोर आली आहे. येत्या 5 दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तवली आहे. राज्यात पावसाचा जोर वाढणार येत्या 5 दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या 3 दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊल होईल. मुंबई ठाण्यातही रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता दिसत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
17 Jun; येत्या ५ दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 17, 2022
पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता.
त्यानंतरच्या 3 दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता.
मुंबई ठाण्यातही रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे.
- IMD pic.twitter.com/yYycL1q5vw
20 व 21 जूनला ऑरेंज अर्लट भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार 19 जून 2022 रोजी जिल्ह्यात जोरदार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तसेच 20 जून 2022 व 21 जून 2022 या दोन दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अर्लट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जोरदार ते अति जोरदार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मराठवाडा-विदर्भ, उत्तर महाराष्ट्र कोरडाच राज्यात मान्सूनचं आगमन झालं असूनही मराठवाडा आणि विदर्भ अजूनही कोरडाच असलेला पाहायला मिळत आहे. तुरळक ठिकाणचा पाऊस वगळता या ठिकाणी म्हणावा असा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे इथला शेतकरी वर्ज अजूनही चिंतेत आहे. तर उत्तर महाराष्ट्रातही काही वेगळी परिस्थिती नाही. नाशिक जिल्ह्यातील काही दुर्गम भागात अजूनही टँकरने तहान भागवली जात आहे. त्यामुळे पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या नागरिकांना कधी दिलासा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.