सिंधुदुर्ग, 07 फेब्रुवारी : 'हे म्हणतात बंदखोलीमध्ये वचन दिले होते. मी कधीच बंददाराआड काम करत नाही. जे काही करायचं ते छातीठोकपणे जाहीर राजकारण करतो, मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांना कोणतेही आश्वासन दिले नव्हते' अशा शब्दांत भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सडकून टीकास्त्र सोडले.
सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या लाईफटाइम मेडिकल कॉलेजचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकार्पण पार पडले. यावेळी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. तसंच काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंग सुद्धा कार्यक्रमाला हजर होते. यावेळी बोलत असता अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
'राज्यात आलेले महाविकास आघाडीचे सरकार हे ऑटो रिक्षावालं सरकार आहे. त्याची तिन्ही चाकं तिन्ही दिशेला आहे. हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. सत्तेच्या लोभापायी जनादेशाविरोधात सरकार तयार केले आहे. हे सरकार विफल ठरलं आहे. जनतेन दिलेल्या पवित्र जनादेश ठोकरून हे सरकार बनले आहे' अशी टीका अमित शहा यांनी केली.
तसंच, 'बिहारमध्ये आम्ही वचन दिले आणि जास्त जागा असूनही नितीश कुमार यांना सांगितल्यानुसार मुख्यमंत्रिपद दिलं. आणि हे म्हणतात बंदखोलीमध्ये वचन दिले होते. मी कधीच बंददाराआड काम करत नाही. जे काही करायचे जे उघडपणे करतो. मी छातीठोकपणे जाहीर राजकारण करतो, मी बंददाराआड कोणतंही वचन दिलं नव्हतं. मी उद्धव ठाकरे यांना कोणतेही आश्वासन दिले नव्हते' असं सांगत अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
विधानसभा निवडणुकीला आपल्या पक्षाच्या सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सगळ्यात मोठं बॅनर असायचे तेव्हा काही आक्षेप नव्हता. त्यांच्या नावाने मतं मागितली तेव्हा कोणताही विरोध केला नाही. तेव्हा आम्ही सगळे सांगत होतो फडणवीस मुख्यमंत्री बनणार, तेव्हा का विरोध केला नाही. भाजप सिद्धांतांचं राजकारण करतं, बाळासाहेबांनतर शिवसेनेने राजकारणाकरता सिद्धांतांना बाजूला ठेवलं. पण सत्तेच्या मोहामुळे बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्न तापी नदीत बुडवली आहे, अशी टीकाही अमित शहांनी केली.
नारायण राणेंचं केलं कौतुक
'जिथे अन्याय आहे तिथे नारायण राणे लढतात. जेव्हा राणेंवर अन्याय झाला तेव्हा त्यांनी संघर्ष केला. आम्ही राणेंवर अन्याय नाही सन्मान करणार आहोत. कोकण प्रदेश दीर्घकाळ राणेंचं योगदान लक्षात ठेवेल, असं म्हणत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी नारायण राणे यांचे कौतुक केलं.
'मला या ठिकाणी प्रेरणा मिळाली. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करत संपूर्ण जगाला प्रेरणा दिली.त्यांनी आयुष्यात तितके पराक्रम केले तितके क्वचितच कोणी करु शकेल. पश्चिम भारतात पहिली नौसेना शिवाजी महाराजांनी उभी केली. त्यावेळेस त्या महा नेत्याने लक्षात घेतलं होतं की नौसेना किती महत्त्वाची आहे, असंही शहा म्हणाले.
'मला कोरोना झाला, याचा काही लोकांना आनंद झाला होता'
130 कोटींच्या या देशात वैद्यकीय सुविधांकडे दुर्लक्ष होते. हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर वीक होतं. मात्र मोदींच्या नेतृत्वात ज्याप्रकारे कोरेनाशी लढाई केली आहे, त्याचे जगात स्वागत होते आहे. पायाभूत सोयीसुविधा आम्ही लॉकडाऊन काळात मंजूर केल्या. व्हेंटीलेटर, मास्क, पीपीई किट इथे बनत नव्हते. अवघ्या 10 महिन्यात आपण एक नंबर निर्यातक झालो आहोत. सर्वात जास्त रिकव्हरी भारतात आहे. मलाही कोरोना झाला होता, त्याचा काही लोकांना आनंदही झाला होता' असा टोलाही शहा यांनी विरोधकांना लगावला.
तसंच, 'वैद्यकीय क्षेत्राने जो लढा दिला त्यांचे अभिनंदन करावं तितकं थोडं आहे. आपले डॉक्टर्स व पॅरा मेडिकल स्टाफने जी लढाई लढली त्याला तोड नाही. आपण तयार केलेली लाईन ऑफ ट्रीटमेंट आज जगात स्वीकारली गेली आहे. जगात फक्त डॉक्टर आणि सरकार लढत असताना भारतात यासोबतच जनतेचे सर्व घटक या लढाईत उतरले, 70% दुनियेतील वॅक्सिन भारत पुरवत आहे, वेगाने वॅक्सिनेशन होत आहे, असंही शहांनी डॉक्टरांचं कौतुक केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.