नागपूर,2 जानेवारी: नववर्षाची सुरुवात झाली असतानाच गारपीटीसह अवकाळी पावसाने राज्यात अक्षरश: थैमान घातले आहे. नागपूर, अमरावती जिल्ह्यात झालेल्या गारपीटीमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. या पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात गारपीट तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोलीत मुसळधार पावसाने झोडपले आहे. नागपुर जिल्ह्यात गुरूवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. काटोल तालुक्यातील दिग्रस बुद्रुक, शिवाय कळमेश्वर तालुक्यातील मोहपा आणि सावनेर तालुक्यातील खापा परिसरात या गावात पहाटेच्या सुमारास गारपीट झाली. बोरांच्या आकाराच्या या गारपिटीमुळे काही घरांच्या छताचे नुकसान झाले आहे. नागपुरात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस आहे. गहू,चना पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी कडाक्याच्या थंडीने जोर पकडला आहे. यवतमाळ जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. काही भागात गारपीटही झाली. या पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान होत आहे. कापूस आणि तूर पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यावर पुन्हा संकटाची कुऱ्हाड कोसळली आहे. ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.
Maharashtra: Water logging in parts of Nagpur due to heavy rainfall. pic.twitter.com/77fX8xn6dC
— ANI (@ANI) January 2, 2020
मराठवाड्यातही मुसळधार पाऊस… मराठवाड्यातील नांदेड, हिंगोलीत मुसळधार पावसाने झोडपले आहे. सकाळी सहा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. मराठवा जिल्ह्यातील इतरही भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. नववर्षातील पहिल्याच अवकाळी पावसामुळे कापणीला आलेल्या तूर पिकाचे आणि शेतातील इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, 2019 मध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा फटका खरीप हंगामाला बसला होता. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन या पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. आता नववर्षाच्या सुरूवातीला झालेल्या अवकळी पावसामुळे आता रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरी चिंतातूर झाला आहे.

)







