भूम, 27 जून: मागील काही वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकरी सततचा दुष्काळ आणि नापिकीला कंटाळला आहे. दरम्यानच्या काळात डोक्यावर कर्जाचं (Loan) ओझं झाल्यानं अनेक शेतकऱ्यांनी आपलं जीवन (Farmer Suicide) आहेत. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना भूममध्ये घडली आहे. भूम तालुक्यातील होडोंग्री येथील रहिवासी असणाऱ्या एका शेतकऱ्यानं कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कल्याण क्षिरसागर असं आत्महत्या केलेल्या 58 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. ते उस्मानाबाद जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील होडोंग्री येथील रहिवासी होते. डोक्यावरील वाढत्या कर्जाच्या बोझ्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. एक वर्षापूर्वी त्यांनी ज्योती क्रांती मल्टिस्टेटमधून अडीच तोळं सोनं गहाण (Gold mortgage) ठेऊन कर्ज घेतलं होतं. पण हे गहाण ठेवलेलं सोनं सोडवता न आल्यानं क्षिरसागर यांना नैराश्य आलं होतं.
याशिवाय त्यांनी बँक ऑफ इंडियातून 40 हजार रुपयांचं पीककर्ज देखील घेतलं होतं. तसेच मृत क्षिरसागर यांचा मुलगा अमोल क्षिरसागर यांच्या नावावर देखील 70 हजार रुपयाचं कर्ज होतं. हे पीककर्ज काढून त्यांनी शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. हे सोयाबीनचं पीक त्यांच्या आयुष्यातील सर्व आर्थिक प्रश्न सोडवणार होतं. पण पेरणी करूनही सोयाबीन पीक उगवून आलं नाही. त्यामुळे दुबार पेरणीचं संकट ओढावलं.
हेही वाचा- लेकराला नाही घेऊ शकले लॅपटॉप, हताश बळीराजानं उचललं टोकाचं पाऊल
दुबार पेरणी कशी करायची आणि डोक्यावरील कर्ज कसं फेडायचं अशा समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या क्षिरसागर यांनी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कुटुंबावर असलेल्या कर्जाच्या ओझ्यामुळे नैराश्य आल्यानं त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.