राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलढाणा, 2 जुलै : समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा शिवारात खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. काल झालेल्या या अत्यंत भीषण अपघातामध्ये तब्बल 26 प्रवाशांचा मृत्यू झाला. ड्रायव्हरचं बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस दुभाजकाला जाऊन आदळली यानंतर बसची डिझेलची टाकी फुटली आणि बसला आग लागली. बसमधून प्रवाशांना बाहेर पडता न आल्यामुळे 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा नजीक झालेल्या या ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातातील मृतांवर आज सामूहिक अंत्यविधी केला जाणार आहे. काल सिंदखेड राजाजवळ भीषण अपघात होऊन 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. सर्व मृतांच्या नातेवाईकांनी ठरविल्याप्रमाणे मृतांवर सामूहिक अंत्यविधी केला जाणार आहे.
बुलडाण्यातील त्रिशरण चौकातील स्मशानभूमीत हा अंत्यविधी होणार असून साधारण: आठ वाजल्यानंतरच हा अंत्यविधी पार पडणार आहे. यातच आता अंत्ययात्रेची तयारी सुरू असताना नातेवाईकांचा एकच आक्रोश सुरू आहे. मन हेलावणारी अशी दृश्य याठिकाणी पाहायला मिळत आहेत.
सिंदखेडराजा जवळ झालेला ट्रॅव्हल अपघातात 25 जण ठार झाले त्याच्या मृतदेहावर आज बुलढाणा येथील स्मशानभूमीत या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्याची तैयारी सुरू असताना नातेवाईकांनी एकाच आक्रोश केला pic.twitter.com/xPcNzxwUGH
— News18Lokmat (@News18lokmat) July 2, 2023
वर्क फ्रॉम होम करणाऱ्या एका तरुणीचाही मृत्यू - विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस नागपूरहून पुण्याला निघाली होती, तेव्हा वर्ध्याहून या बसमध्ये श्रेया मदन वंजारी ही 24 वर्षांची तरुणी बसली. श्रेया पुण्यामध्ये नोकरी करत होती, पण सध्या तिचं वर्क फ्रॉम होम सुरू होतं. एमबीएचा पेपर देण्यासाठी श्रेया पुण्याला निघाली होती, पण या अपघातामध्ये तिला जीव गमवावा लागला आहे. मुख्यमंत्री काय म्हणाले? या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातावेळी नेमकं काय घडलं याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. ‘झालेली घटना दुर्दैवी आहे, सकाळपासूनच आम्ही कलेक्टर, एसपी आणि आयजींच्या संपर्कात होतो. प्रत्यक्ष पाहिल्यानंतर अपघाताची भीषणता लक्षात येते. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दुर्घटना घडली आहे. खांबाला धडकून गाडीची टाकी बर्स्ट झाली आणि गाडी पुढे घासत जाऊन आग लागली. प्रत्यक्षदर्शी तसंच सांगत आहेत आणि रिपोर्टही तसाच आहे. लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. आठ माणसं बाहेर निघाली आणि आठ जखमी झाली,’ असं मुख्यमंत्री म्हणाले. ‘समृद्धीवरचे अपघात जास्तीत जास्त मानवी चुका, चालकांच्या चुकांमुळे झाले आहेत. असे अपघात होऊन चालणार नाही. आपल्याला प्रत्येक जीवाची काळजी आहे, त्यामुळे सरकारने प्रकरण गांभिर्याने घेतलं आहे. सगळी यंत्रणा जागेवर पोहोचली मात्र दरवाजा बंद असल्यामुळे त्यांना बाहेर येता आलं नाही. अपघात होऊ नये म्हणून सरकारला काही करायला हवं ते सरकार करेल,’ असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं.