मुंबई, 03 नोव्हेंबर : राज्यात मागच्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला होता. झालेल्या पावसाने हातातोंडाशी आलेलं पीक गेल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाल्याने याबाबत सरकारकडे मदतीची मागणी करण्यात आली होती. यावर राज्य सरकारने नुकसान भरपाई म्हणून आतापर्यंत 4 हजार 700 कोटी रुपयांची मदत केल्याची माहिती देण्यात आली. तसेच अजुनही शेतकरी मदतीपासून वंचित असल्याने शेतकऱ्यांना आणखी मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी आत्तापर्यंत 4 हजार 700 कोटी रुपयांची वाढीव दराने मदत देण्यात आली आहे. आता ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठीसुद्धा मदत देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली.
हे ही वाचा : 'गुलाबराव पाटलांच्या कारकिर्दीत मोठा घोटाळा...' शिंदे गटाच्या मंत्र्यावर सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप
ऑक्टोबरमध्ये पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 25 लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. आजपर्यंत कधीही सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात नव्हती. मात्र शासनाने प्रथमच अशा शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सुमारे 750 कोटी रुपये इतके वाटप करण्यात आले आहे.
ऑक्टोबर महिन्यात झालेला सततचा पाऊस आणि नुकसानीसाठी हेच निर्णय लागू करण्यात येणार आहेत. आपण महसूल आणि कृषी विभागाला निर्देश दिले होते, त्याप्रमाणे सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने सुरू असून यासंदर्भात प्रशासनाला सूचना दिल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत चर्चा झाल्याप्रमाणे या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर संपावावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. जेणेकरुन त्यांना मदत करता येईल. मदत व पुनर्वसन विभागाने माहिती दिल्याप्रमाणे जून-जुलै पासून सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या 40 लाख 15 हजार 847 शेतकऱ्यांना सुमारे 4700 कोटींची मदत करण्यात आली आहे. ही मदत एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीने जास्त व दोन ऐवजी तीन हेक्टर अशी वाढीव आहे.
हे ही वाचा : हनुमानाचा भक्त खोटे बोलेल काय? 'कडू' वादावरून शिवसेनेनं रवी राणांना डिवचलं
या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही अंतिम टप्यात आहे. लवकर याबाबत विहित नमून्यात शासनास निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त होतील. शासन शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील असून मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत या शेतीपिकांच्या नुकसानीची दखल घेण्यात आली. ऑक्टोबर 2022 मधील या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दुप्पट दराने 3 हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्याचे शासनाकडून आश्वासित करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Cm eknath shinde, Farmer, Farmer protest, Maharashtra political news