जळगाव, 28 एप्रिल : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) रोज नवनवीन गौप्यस्फोट समोर येताना दिसत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) आधी राज्यात शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांचं महायुतीचं सरकार होतं. पण महायुतीच्या सरकार काळातही शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी शिवसेना मंत्री खिशात राजीनामा घेऊन फिरत असल्याचे वक्तव्य शिवसेनेच्या नेत्यांकडून केले जात होते. त्याचकाळात राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) सोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन करावं, असा भाजपने निर्णय घेतल्याचा गौप्यस्फोट भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला. त्यांच्या याच गौप्यस्फोटावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपलाच शिवसेनेसोबत युती नको होती. त्यामुळेच त्यांनी शिवसेनेला युती तोडण्यास भाग पाडलं, असा मोठा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.
एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले?
"निवडणुकीच्या कालखंडामध्ये त्यांचा काही महत्त्वाचा रोल नव्हता. आशिष शेलार आता जे वक्तव्य करत आहेत, पण त्यावेळी ते निर्णय प्रक्रियेत नव्हते. त्यामुळे त्यांना पुरेशी माहिती नाही. खरी माहिती ही वेगळीच आहे. शिवसेनाला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं असतं, पहिल्यांदा द्या किंवा नंतर द्या, तर हा प्रश्न निर्माण झाला नसता. पण तुम्हालाच मुख्यमंत्रीपद पाच वर्ष हवं होतं. त्यामुळेच तुम्ही शिवसेनेला युती तोडण्यासाठी भाग पाडलं, असं एकदंरीत मागचा इतिहास आहे. त्यावेळेस मी निर्णय प्रक्रियेत होतो. त्यामुळे त्या कालखंडात काय झालं हे त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे", असा टोला एकनाथ खडसे यांनी आशिष शेलारांना लगावला.
('सभेला फक्त 15 हजार लोकं हवीत, जात-धर्मावर वक्तव्ये नको', राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांच्या अटी)
आशिष शेलार नेमकं काय म्हणाले होते?
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन करण्याच्या संदर्भात 2017 मध्येच चर्चा झाली होती. इतकेच नाही तर निवडणुकीच्या संदर्भात जागा वाटप आणि त्यानंतर सत्तेत आल्यावर खातेवाटपाच्या संदर्बातही चर्चा झाली होती. भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं तिघांचं सरकार असण्याच्या संदर्भात चर्चा झाली.
युतीची चर्चा झाली पण...
शिवसेनेला दूर न करण्याचा सल्ला भाजपच्या केंद्रातील नेत्यांनी दिला होता. पण शिवसेना सोबत असताना युती करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने नकार दिला आणि त्यामुळे शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी असं सरकार स्थापन झालं नाही असं आशिष शेलार म्हणाले. दैनिक 'लोकसत्ता'ने आयोजित केलेल्या 'दृष्टी आणि कोन' या कार्यक्रमात आशिष शेलार यांनी हे विधान केलं आहे.
बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना-भाजप युतीमध्ये मैत्रिपूर्ण संबंध होते. पण बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेत्रृत्वात शिवसेनेसोबत भाजपचे पूर्वीसारखे मैत्रीपूर्ण संबंध राहिले नाहीत, असंही आशिष शेलार यांनी म्हटलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.