पालघर, 28 मार्च : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. परंतु, आज चौथ्या दिवशी लोकांचा संयम सुटत चालला आहे. शहरात अडकून पडलेली परराज्यातील लोकं पायी किंवा मिळेल त्या वाहनाने गावी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.
संचारबंदी असल्याने आता दुधाच्या टँकरमध्ये नक्की दूध आहे की माणसं याकडे पोलीस लक्ष ठेवून आहेत. कारण देखील तसंच असून दुधाच्या टँकरमधून चक्क कामगारांना गावी घेवून जात असल्याचा प्रकार तलासरीत उघड झाला आहे.
कल्याणहून राजस्थानकडे दुधाच्या टँकमध्ये कामगारांना बसवून घेवून जात असताना तपासणी दरम्यान तलासरी पोलिसांनी कारवाई केली आहे.
कोरोनासाठी सुरू असलेली संचारबंदीमुळे आपल्या गावाकडे जाण्यासाठी कामगार अनेक युक्त्या लढवत आहेत. कल्याणहून राजस्थानला जाण्यासाठी 12 कामगारांनी चक्क दुधाच्या टँकरमधून प्रवास करताना पालघर जिल्ह्यात पोलिसांनी कामगार आणि टँकर चालकाला ताब्यात घेतलं आहे. कल्याणहून राजस्थानकडे जाण्यासाठी निघालेले वाहन तलासरी पोलिसांनी तपासणीसाठी थांबवले होते.
हेही वाचा -...तर 29 एप्रिलला खरंच होणार जगाचा अंत? नासाने सांगितलं काय आहे सत्य
वाहनांची तपासणी केली असता त्यामधून कोंबुन भरलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आलं. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असून राज्याच्या सीमा सील असल्याने टँकरचालक नवीन शक्कल लढवताना दिसत आहेत. तलासरी पोलिसांनी टँकरसह चालक आणि कामगारांना ताब्यात घेतलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.