जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बेड मिळाला नाही म्हणून बस स्थानकावर थांबले अन् पत्नीच्या उशालाच पतीने प्राण सोडले

बेड मिळाला नाही म्हणून बस स्थानकावर थांबले अन् पत्नीच्या उशालाच पतीने प्राण सोडले

बेड मिळाला नाही म्हणून बस स्थानकावर थांबले अन् पत्नीच्या उशालाच पतीने प्राण सोडले

वणवण फिरूनही बेड न मिळाल्यानं महिलेनं कोरोनाग्रस्त पतीसह एसटीच्या प्रवासी निवाऱ्यात आसरा घेतला. पण इथंच…

  • -MIN READ
  • Last Updated :

हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 18 एप्रिल :  एखाद्या घटनेनंतर सुन्न होणं म्हणजे काय असतं ते पुढील घटना समजल्यानंतर तुम्हाला कळेल. चंद्रपूर (Chanrapur) जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरीमध्ये कोरोना (Corona) रुग्णाचा उपचाराविना तडफडून मृत्यू झाला. वणवण फिरूनही बेड न मिळाल्यानं महिलेनं कोरोनाग्रस्त पतीसह एसटीच्या प्रवासी निवाऱ्यात आसरा घेतला. पण इथंच या रुग्णांनं तडफडून-तडफडून प्राण सोडले. कोरोना आणखी किती बळी घेणार हा प्रश्न तर अनुत्तरीत आहेत. मात्र, आणखी किती हाल, किती अवहेलना आणि मृत्यूचे किती कुरूप चेहरे तो आपल्याला दाखवणार हे कळेनासं झालं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी शहरात असाच मृत्यूचा एक विद्रूप चेहरा रविवारी पाहायला मिळाला. नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील कुही तालुक्यातील अंभोरा येथील 50 वर्षीय गोविंदा निकेश्वर यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांची पत्नी त्यांना चंद्रपूरला घेऊन आली होती. चंद्रपूरमध्ये ब्रह्मपुरी शहरात आल्यानंतर त्यांनी अनेकठिकाणी प्रयत्न केले, पण त्यांच्या पतीवर उपचार करण्यासाठी त्यांना बेड मिळाला नाही. कित्येक तास एका एका श्वासासाठी झगडत असलेल्या पतीला घेऊन त्या फिरत राहिल्या पण कुठेही बेड मिळाला नाही. अखरे रात्र कुठं घालवायची तर शहरातल्या ख्रिस्तानंद रुग्णालयासमोर असलेल्या एस.टी. प्रवासी निवाऱ्याचा आसरा त्यांनी घेतला. पण यावेळी गोविंदा निकेश्वर यांची तब्येत अधिकच खालावली होती. कोरोनाने स्थिती गंभीर झालेली आणि उपचार मिळत नसल्याने अगदी एकेका श्वासासाठी त्यांचा लढा चालला होता. संपूर्ण रात्र अशीच तडफडत निघाली पण जीवन मृत्यूच्या या संघर्षात काळानं बाजी मारली आणि सकाळी गोविंदा यांचा मृत्यू झाला. (वाचा- मनमोहन सिंग यांचं पंतप्रधान मोदींना पत्र, Corona विरुद्ध लढण्यासाठी दिले 5 मंत्र ) ज्या कुटुंबानं घरातला कर्ता पुरुष गमावला त्यांच्यासाठी ही आपत्ती आहे. त्या कुटुंबासाठीच काय, पण आपल्या देशात अशाप्रकारे एखाद्याचा तडफडून अक्षरश: रस्त्यावर मृत्यू होत असेल तर ती संपूर्ण देशासाठीच आपत्ती म्हणावी अशी घटना आहे. (वाचा- ‘या’ देशानं महिलांना दिला गर्भवती न होण्याचा सल्ला, समोर आलं धक्कादायक कारण ) ब्रह्मपुरीचे माजी आमदार आणि भाजप नेते अतुल देशकर यांनी ही घटना सरकारचा निष्काळजीपणा दर्शवत असून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तातडीनं राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. मंत्री राजीनामा देतील किंवा नाही, हा राजकारणाचा भाग आहे. पण नवऱ्याला बरं करण्यासाठी घेऊन आलेली गोविंदा यांची पत्नी परत एकटी जाताना तिच्या मनात काय वादळ असेल, आणि अशी किती वादळं रोज मनातल्या मनातच दबली जातायेत हा सर्वात गंभीर मुद्दा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात