मुंबई, 14 डिसेंबर : श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला. तिचा प्रियकर आफताबने तिची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले. असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी आता राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. यासाठी महिला व बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती नेमण्यात आली आहे. आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलींची तसेच त्यांच्या कुटुंबीयांची माहिती घेऊन त्यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याची जबाबदारी या समन्वय समितीची असणार आहे. संबंधित मुली किंवा त्यांचे कुटुंबीय जर समन्वयासाठी तयार नसतील तर त्यांचे समुपदेशन देखील या समितीमार्फत केले जाणार आहे. 13 सदस्यांची समिती मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली ही 13 सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. या समितीवर सदस्य म्हणून महिला व बालविकास विभाग प्रधान सचिव, आयुक्त, सहसचिव, अॅड योगेश देशपांडे, संजीव जैन, सुजाता जोशी, अॅड प्रकाश साळसिंगिकर, यदू गौडिया, मीराताई कडबे, शुभदा कामत, योगिता साळवी यांच्यासह महिला व बालविकास आयुक्तालयाचे उपायुक्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हेही वाचा : काँग्रेसने ‘आप’च्या डोक्यावर फोडले गुजरात पराभवाचे खापर; भाजपवरही गंभीर आरोप
समिती नेमकं काय काम करणार?
आंतरधर्मीय व आंतरजातीय नोंदणीकृत विवाह, अनोंदणीकृत विवाह, पळून केलेले आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह यांची संपूर्ण माहिती ठेवण्याची जबाबदारी या समितीवर असणार आहे. ही समिती अशा मुलींच्या पालकांना तसेच मुलींना भेटून त्यांच्यामध्ये समन्वय घडवून आणणार आहे. समन्वय न झाल्यास समुपदेशन देखील करण्यात येणार आहे.