मुंबई, 20 सप्टेंबर: महाविकास सरकार पाडण्यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांनीच प्रयत्न केला होता, पण तो वेळीच हाणून पाडला, असा धक्कादायक गौप्यस्फोट खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. आता त्यावर भाजपनं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जहरी टीका केली आहे. राज्याचे गृहमंत्री वाचाळवीर आहेत. त्यांनी तातडीनं राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. हेही वाचा… संजय राऊत यांचा मोदी सरकारला खोचक सवाल, मंत्र्यांनं अफवेमुळे राजीनामा दिला का? अनिल देशमुख यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात काय कारवाई केली, याची माहिती जनतेपासून का लपवून ठेवली? या गृहमंत्र्यांचे आयपीएस अधिकाऱ्यांना दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणी दोन महिन्यात एक इंचही पुढे सरकता आलं नाही. त्यांना राज्य सरकार पाडण्याचं बळ कुठून आलं? असे सवाल देखील आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहेत.
राज्याचे गृहमंत्री वाचाळवीर... भाजप नेत्याची जहरी टीका#BJP @CMOMaharashtra @AnilDeshmukhNCP @BhatkhalkarA pic.twitter.com/qN4sXAQLaZ
— News18Lokmat (@News18lokmat) September 20, 2020
काय आहे प्रकरण? ‘दैनिक लोकमत’ ऑनलाइनच्या ‘ग्राउंड झीरो’ कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्र्यांनी हा खुलासा केला आहे. काही अधिकारी हे चांगले काम करत आहेत. पण काही पोलीस खात्यात काही अधिकारी असेही आहे जे राजकीय नेत्यांशी जवळीक साधून आहेत. त्यांची नाव घेता येणार नाही, असं सांगत गृहमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. चार ते पाच वरिष्ठ अधिकारी आहे. ज्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. यात एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश आहे. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने त्यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली आणि हे प्रकरण मार्गी लावले. एवढंच नाहीतर, शरद पवारांनी एका महिला अधिकाऱ्याचे नाव घेतले. त्यानंतर तातडीने पदावरून बाजूला करण्यात आले. त्याच बरोबर चार अधिकाऱ्यांची नावही सांगितली. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने तातडीने पावलं उचलत काही अधिकाऱ्यांना बाजूला सारले. तर काही अधिकारी अजूनही पदावर कायम आहे. अशा अधिकाऱ्यांना तातडीने बाजूला हटवायला पाहिजे होते, अशी मागणी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने केली होती. दरम्यान, मार्च महिन्यात लॉकडाउन लागू झाला. त्यानंतर अमिताभ गुप्ता या पोलीस अधिकाऱ्यांनी येस बँक घोटाळ्यातील आरोपी उद्योगपती कपिल वाधवान यांच्यासह 22 जणांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी पत्र दिले होते. या पत्रामुळे भाजपने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले होते. नुकतीच अमिताभ गुप्ता यांची बदली करण्यात आली असून पुण्याचे आयुक्त म्हणून नियुक्त केले आहे. अमिताभ गुप्ता यांच्याकडून मोठी चूक झाली होती. त्यांनी खुद्द चौकशी समितीकडे याची कबुली दिली. पण त्यांची कारकिर्द चांगली असल्यामुळे त्यांना पुण्याचा पदभार दिला, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. हेही वाचा… हा तर शेतकऱ्यांना भांडवलदारांचा ‘गुलाम’ बनण्याचा डाव, राहुल यांचा मोदींवर निशाणा भाजपचे नेते वारंवार राजभवनावर जावून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत असतात. कोणत्याही मुद्यावर देवेंद्र फडणवीस हे राजभवनाकडे धाव घेतात. त्यापेक्षा फडणवीस यांनी राजभवनावर खोली घेऊन राहावे, म्हणजे जाण्या-येण्याचा त्रास कमी होईल, असा टोलाही गृहमंत्र्यांनी लगावला.