मुंबई, 07 ऑगस्ट : शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. पण, आता दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यातला वाद पुन्हा एकदा पेटला आहे. दीपक केसकरांनी आरोप केल्यानंतर माघार घेतली पण आता निलेश राणेंनी केसरकरांना थेट ड्रायव्हरच्या नोकरीची ऑफर देऊन डिवचले आहे. त्यामुळे शिंदे गट-भाजपमध्ये वाद पेटण्याची चिन्ह आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी भाजपचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला होता. नारायण राणेंनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची बदनामी केली. त्याबद्दल आपण त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार केली होती, असं विधान केसरकरांनी केलं होतं. पण, यावरून भाजपमध्ये नाराजीचे सूर उमटले. आता निलेश राणे यांनी थेट केसरकरांवर टीकास्त्र सोडले आहे.
दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 7, 2022
‘दीपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे’ असं म्हणत निलेश राणेंनी एकेरी उल्लेख करत केसरकरांवर टीकास्त्र सोडले आहे. विशेष म्हणजे, या वादावर पडदा टाकत दीपक केसरकर यांनी माघार घेतली. केसरकारांनी पत्रकार परिषद घेवून आपण यापुढे राणेंविषयी विधान करणार नाही, असं विधान केलं आहे. “मी काल जे मुद्दे उपस्थित केले होते त्या मुद्द्यांना बगल दिला जात आहे. उद्धव ठाकरेंकडून आरोप करण्यात आला की, माझ्या कुटुंबावर जेव्हा आरोप झाले तेव्हा तुम्ही गप्प बसले होते, असं ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या त्याच विधानाला मी उत्तर दिलं होतं. आम्ही गप्प बसलो नव्हतो. देशाच्या सर्वोच्च नेत्याकडे याबाबत तक्रारही केली होती”, असं स्पष्टीकरण केसरकारांनी दिलं. “माझा आणि नारायण राणे यांचा वाद झाला होता हे सर्वश्रूत आहे. पण प्रत्येक घटनेचा संबंध त्याच्याशी जोडणं चुकीचं आहे. मी त्यावेळी त्यांच्या अत्यंत आदरपूर्वक वागलेलो आहे. अनेकवेळेला मी सांगितलं आहे की राणेंसोबत माझा कोणताही वैयक्तिक वाद नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्याबरोबर काम करण्याची वेळ आली तर मी निश्चितपणे तयार आहे”, असं दीपक केसरकर म्हणाले. “मी शरद पवारांच्या संदर्भात वक्तव्य करणं चुकीचं आहे, त्यामुळे मी त्यांचं नाव घेवून काहीच बोलत नाही. त्यांच्याबद्दल बोललो की वाईट बोललो, असं होतं. तसंच आता नारायण राणे यांच्याबद्दल बोललो की माझा त्यांच्यासोबत आधी झालेल्या वादाशी संबंध जोडला जातो. त्यामुळे यापुढच्या काळात मी नारायण राणे यांचं नाव घेणार नाही. विषयानुरुप बोललं पाहिजे. माझ्या मुद्द्याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं”, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली होती.