अहमदनगर, 24 ऑक्टोबर : ‘विधानसभा निवडणूक निकाल लागून एक वर्ष होऊनही मतदारसंघात एकही विकास काम आणि उद्योग धंदे आणले नाहीत, मात्र पवार यांनी स्वतःचेच उद्योग धंदे वाढवले व जनतेला वेड्यात काढले. निवडणुकीदरम्यान घोषणा केलेला बारामती पॅटर्न म्हणजे निव्वळ भुलभुलैय्या आहे,’ अशी टीका माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केली आहे. ‘महाविकास आघाडी सरकारच्या विधानसभा निवडणुकीच्या वर्षपूर्ती निमित्ताने जामखेड तालुक्याने काय कमावले काय गमावले, अशी चर्चा सुरू आहे. मात्र गेल्या वर्षभरात कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात एकही असे भरीव काम दिसून आले नाही,’ असा आरोप करत प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली. पाण्याचे टँकर…सोशल डिस्टन्सिंग आणि आगामी काळातील निवडणुका, काय आहे राम शिंदेंचा दावा? ‘निवडणुकीअगोदर पाण्याचे शंभर टँकर सुरू केले. मात्र ते या वर्षीच्या उन्हाळ्यातील टंचाईमध्ये कोठे गेले? पवार हे फक्त फोडाफोडीचे राजकारण करतात. गोरगरिबांना सोशल डिस्टन्सिंगचा कडक नियम होता. मात्र आमदारांना बारामती येथून जामखेडमध्ये येऊनही हा नियम नव्हता. कोरोना महामारीमध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील मुलांना वेठीस धरण्याचे काम केले. महिला बचत गटांवर दबाव टाकून त्यांना हायजॅक करण्याचे काम सुरू आहे. कोरोना काळात भाजप नगरसेवकांवर गुन्हे दाखल केले. मात्र आमदार व तहसीलदार यांनी एका गाडीत फिरुन सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. त्यावर काही कारवाई केली गेली नाही,’ असा असा घणाघात राम शिंदे यांनी केला. लवकरच येणार्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या कामांना लागायचे असून या सर्व ठिकाणी भाजपचीच सत्ता येईल असा विश्वास राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.