मुंबई, 24 मार्च : राजकीय मतभेद विसरून ओबीसींनी एका छताखाली यावं, असं पत्रक भाजप आमदार परिनाय फुके यांनी काढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपने (BJP) पुन्हा एकदा ओबीसी मतदारांना (OBC Voter) साद घालण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकारने म्हणजेच जाहीर केलेलं मराठा आरक्षण आणि त्यासाठी न्यायालयात उभी केलेली फौज...सत्ता गेल्यानंतरही सतत मराठा आरक्षणाचा केलेला पाठपुरावा राज्यातील ओबीसी समाजाला विशेष म्हणजे भाजपच्या हक्काच्या मतदारांना आवडला नाही. त्यात पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे यांच्याबाबत जी भूमिका पक्षाने घेतली त्यामुळे कुठेतरी ओबीसी समाजात नाराजी पसरली.
दुसरीकडे, मराठा आरक्षण दिल्यानंतर महाराष्ट्रातील गरीब मराठा मतदार ओबीसी सोबत भाजपला जोडला गेला तर कायम स्वरूपी भाजपची सत्ता राहील हा मराठा आरक्षणामागे हेतू होत, तो आता लपून राहिला नाही. पण विधानसभा निवडणुकीत भाजपला मराठा समाजाने स्वीकारलं का? असा प्रश्न निकालानंतर उपस्थित झाला. तसंच भाजपचा हक्काचा समजला जाणारा ओबीसी समाजही नाराज झाला.
मराठा समाज स्वीकारत नाही आणि ओबीसी लांब जातो की काय अशा कोंडीत भाजप सापडला. गेल्या 2 महिन्यापासून भाजपनं मराठा समाजाबाबत शांत राहण्याची भूमिका घेतली आणि पुन्हा ओबीसी कार्ड बाहेर काढलं. स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी समाजाला 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही ही भूमिका सर्वोच्च न्यायालयाने मांडली. त्यानंतर भाजपने विधानसभेवर ओबीसी मोर्चा काढून सुरुवात केली.
भाजपनं गेल्याच महिन्यात घेतलेल्या चिंतन बैठकीत प्रत्येक जिल्ह्यात ओबीसींची हक्क परिषद घेण्याचा निर्णय घेतला. या चार वर्षात भाजपमध्ये ओबीसी नेते अडगळीत पडले. पण त्याच बरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं ओबीसी नेत्यांना ताकद दिली. विजय वडेट्टीवार, नाना पटोले, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, एकनाथ खडसे, गुलाबराव पाटील, या नेत्यांना बळ दिले. ओबीसींकडून मराठा मतदारांकडे जाताना समाजाचा राजकीय कल नवीन भाजप नेत्यांनी जाणून घ्यायला हवा होता.
महाराष्ट्र अस्तित्वात आल्यापासून काँग्रेसमध्ये मराठा हे सत्ताकेंद्र राहिलं आहे. त्या जोडीला मुस्लीम आणि दलित हा काँग्रेसचा मतदार राहिला. या सगळ्यात ओबीसी समाजाची होत असलेली घुसमट भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष उत्तमराव पाटील यांनी जाणली. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांचं नेतृत्व पुढे आणलं. त्याला संघटन मंत्री वसंतराव भागवत यांनी पाठिंबा दिला. ना स फरांदे आणि अण्णा डांगे यांची मुंडे यांना जोड मिळाली.
भाजपमध्ये 'माधव' म्हणजेच माळी-धनगर-वंजारी या राजकीय फॉर्म्युल्याला अभूतपूर्व यश आलं. ज्या समाजाच्या नेत्यांना मराठा जवळीक असलेल्या काँग्रेसकडून नेतृत्व दिलं नाही अशा सर्वांना भाजपमध्ये संधी मिळाली. ओबीसींना भाजप आपलासा झाला. ओबीसी हा आपला हक्काचा मतदार आहे हे भाजपनं गृहीतच धरलं, हा मतदार भाजपला सोडणार नाही हे गृहीत धरून काही मराठा मतदार जवळ झाला तर कायम स्वरूपी सत्ता येईल, असा अंदाज भाजपने बांधला. पण तो सपशेल अपयशी झाला. मराठा समाजाने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसपासून पूर्णपणे दूर न होणंच पसंत केलं.
विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेत अपयश आल्यानंतर भाजपने अडगळीत टाकलेल्या सुधीर मुनगंटीवार, बावनकुळे, पंकजा मुंडे यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणायला सुरुवात केली आणि नव्याने ओबीसी हक्क परिषद चळवळ सुरू केली. आगामी मिनी विधानसभा असलेली जिल्हा परिषद निवडणूक वर्षभरात येऊ घातली आहे. त्यावेळी या निवडणुकीत कोणाला कसं राजकीय यश मिळतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Devendra Fadnavis, Nana Patole, Politics